
Pune News: विमा कंपन्यांनी २९ जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात २५ एप्रिलपर्यंत २ हजार १९१ कोटी रुपये विमा भरपाई जमा केली. शेतकऱ्यांना एकूण ३ हजार १८४ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. अजून ९९३ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरु आहे, अशी माहीती कृषी विभागाने दिली.
राज्यातील शेतकऱ्यांना सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरमधून भरपाई देण्याचे काम सुरु आहे. काही जिल्ह्यांमध्ये या दोन्ही ट्रीगरमधून भरपाई मिळत आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये केवळ एकाच ट्रीगरमधून भरपाई मिळत आहे. राज्यातील २९ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा करण्याचे काम सुरु आहे.
मराठवाड्यातील भरपाई
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये भरपाई मंजूर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना ५६४ कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे. त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात ३३९ कोटी रुपये जमा करण्यात आले. तर २२४ कोटी रुपये प्रलंबित आहेत. ते जमा करण्याचे काम सुरु आहे.
लातूर विभाग
लातूर विभागात लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना १ हजार ३४० कोटी रुपये विमा भरपाई मंजूर आहे. त्यापैकी १ हजार १९९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. तर अजून १४० कोटी रुपयांची भरपाई जमा करण्याचे काम सुरु असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
विदर्भातील भरपाई
विदर्भातील गोंदीया जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पीकविम्याची भरपाई मंजूर झाली आहे. अमरावतील विभागात बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्याचा समावेश होतो. या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना ६२९ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी ४३३ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. तर आणखी १९५ कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरु आहे, असे कृषी विभागाने सांगितले.
नागपूर विभाग
नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली आहे. नागपूर विभागात एकूण २०१ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी १८० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. तर २१ कोटी रुपये जमा करण्याचे कम सुरु आहे.
नाशिक विभाग
नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १५० कोटींची भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी २७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. तर १२२ कोटी रुपये प्रलंबित असून ते जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पुणे विभाग
पुणे विभागातील अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना विमा भरपाईपोटी २८३ कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे. ही सर्व भरपाई प्रलंबित आहे. ही भरपाई जमा करण्याचे काम सुरु आहे, असे कृषी विभागाने सांगितले.
कोल्हापूर विभाग
कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १५ कोटी ४९ लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी ९ कोटी ६७ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर अजून ५ कोटी ८२ लाख रुपये जमा करण्याचे काम सुरु आहे, असे कृषी विभागाने सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.