Bhandara News : खरीप हंगामात हमीभावाने खरेदी केलेल्या धानाची भरडाई रखडली आहे. परिणामी २१ लाख क्विंटल धान गोदामातच पडून असल्याने एक मेपासून सुरू होणाऱ्या उन्हाळी हंगामातील धान खरेदीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळेच प्रशासनाने या प्रकरणात तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे.
हंगामात धान खरेदी होत असल्याने त्याच्या साठवणुकीची पर्याप्त सोय राहत नाही. परिणामी गोदामाची मोठी कमरता निर्माण होते. शासकीय गोदाम तर केवळ नावालाच आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात आधारभूत खरेदी केंद्रांतर्गंत खरेदी करण्यात आलेला धान व एफसीआयअंतर्गंत गोळा केलेला तांदूळ यांच्या साठवणुकीचा प्रश्न ऐरणीवर येतो.
परंतु शासनस्तरावरून धान भरडाईचा प्रश्न सोडविण्यात न आल्याने यंदाही खरीप हंगामातील २१ लाख क्विंटल धान गोदामातच पडून आहे. परिणामी एक मे पासून सुरू होणाऱ्या उन्हाळी हंगामातील धान खरेदीचा गुंता वाढेल, अशी भीती वर्तविली जात आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आधारभूत खरेदी केंद्रधारक चोरीचा पर्याय निवडतात. खरेदी व उचल याचे नियोजन होत नसल्याने खरेदीअंती हिशोब जुळत नाही.
नाइलाजाने खरेदी केंद्रधारकांना चोरीशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. यात अप्रत्यक्षरीत्या शेतकरी भरडला जातो. धान खरेदीनंतर केवळ १५ ते ३० दिवसांतच धानाची उचल झाल्यास एक टक्क्यापर्यंत तूट मान्य आहे. मात्र शासनस्तरारूनच चार ते पाच महिने धान उचल होत नाही. यामुळे तूट वाढते. आधारभूत केंद्रधारकांसाठी ती अडचणीची ठरते. यात शासनाचा दोष असताना त्याकरिता केंद्रधारकांभोवती कारवाईचा फास आवळला जातो, असाही आरोप आहे.
गिरणी मालकांच्या आहेत या मागण्या...
१५०१ रुपये प्रति क्विंटल भरडाई दर मिळावा, हमाली खर्चात वाढ करून द्यावी, वाहतूक खर्चात सुद्धा वाढ व्हावी, अशा गिरणी मालकांच्या मागण्या आहेत. त्याच्या पूर्ततेच्या मागणीरून भरडाई रखडली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.