
Pune News: पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रांत पावसाचा जोर कमी-अधिक होत आहे. वडिवळे, मुळशी, टेमघर अशा काही धरणक्षेत्रांत पावसाचा जोर अधिक आहे. शुक्रवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंत शिरगाव घाटमाथ्यावर सर्वाधिक १६० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे.
गेले दोन दिवस पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. परंतु गुरुवारी रात्रीपासून पुन्हा जोर वाढला आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. आंबोणे या घाटमाथ्यावर १५४ मिलिमीटर पाऊस पडला. दावडी घाटमाथ्यावर १२७ मिलिमीटर, लोणावळा १०१, डोंगरवाडी ९९, ताम्हिणी ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक ७३ मिलिमीटर पाऊस पडला असून टेमघर ४८, वडिवळे, पवना ४४, गुंजवणी ३५, कासारसाई ३०, नीरा देवघर, वडिवळे २६, तर इतर धरणक्षेत्रात हलक्या सरी बरसल्या.
सध्या पूर्व पट्ट्यातील तालुक्यातील गावांमध्ये पेरणी सुरू आहे. या ठिकाणी बागायती क्षेत्र असल्यामुळे अनेक शेतकरी उन्हाळी बाजरीचे पीक घेतात. तर काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने पावसाळी बाजरी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन पीक घेतात. विविध गावांमध्ये बाजरी पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे.
पश्चिमेकडील भोर, मुळशी, मावळ, वेल्हे (राजगड), जुन्नर, आंबेगाव, खेडच्या पश्चिम भागात सध्या पावसाची स्थिती चांगली आहे आणि पेरणीची कामे जोरात सुरू आहेत. भात रोपवाटिकेची कामे रखडली असून काही ठिकाणी ती अंतिम टप्यात आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असले तरी, सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. या तालुक्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आहे.
काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पेरणीला उशीर झाला असला तरी, सरकारने शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वेल्हे (राजगड) तालुक्यातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांना खते आणि बियाणे वेळेवर मिळावे यासाठी सरकारने उपाययोजना केल्या आहेत. पीक विमा योजना प्रभावीपणे राबविण्याचे आदेश वेल्हे तालुक्यातील कृषिविभागाकडून देण्यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नियमितपणे पाहणी करावी, नुकसान झाल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असा संदेश देण्यात आला आहे.
दोन धरणांतून विसर्ग वाढवला
कासारसाई धरणाच्या सांडव्यातून कासारसाई नालापात्रात २०० क्युसेकने सुरू असणारा विसर्ग वाढवून १३८० क्युसेकने करण्यात येत आहे. वडिवळे धरणाच्या सांडव्यातून कुंडली नदी पात्रामधील विसर्ग वाढवून ११०४ क्युसेक करण्यात येत आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावे. सखल भागातील संबंधित नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.