Chhatrapati Sambhajinagar : जिल्हा वार्षिक पतआराखड्यात २०२४-२५ साठी प्राधान्य क्षेत्रासाठी १२ हजार ५०२ कोटी रुपये तर इतर क्षेत्रासाठी १० हजार ६६० कोटी रुपये २३ हजार १६२ कोटी रुपयांचा समावेश आहे. प्राधान्य क्षेत्रात कृषीसाठी २४०० कोटी रुपये, सुक्ष्म व मध्यम प्रक्रिया उद्योग ६५०५ कोटी रुपये, शिक्षण ३० कोटी, गृह ६७५ कोटी या प्रमाणे क्षेत्रनिहाय उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील बॅंकिंग क्षेत्राने २०२४-२५ करिता विविध क्षेत्रात एकूण २३ हजार १६२ कोटींचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. १०) जिल्ह्याच्या वार्षिक पत आराखड्याचे प्रकाशन करण्यात आले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,
महाराष्ट्र ग्रामिण बॅंकेचे सहायक महाप्रबंधक मनोहर वाडकर, रिझर्व्ह बॅंकेचे सहायक महाव्यवस्थापक नरसिंग कल्याणकर, ‘नाबार्ड’चे सहायक महा व्यवस्थापक सुरेश पटवेकर, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, तसेच बॅंकांचे प्रमुख उपस्थित होते.
पायाभूत सुविधानिर्मिती
कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्मितीची राज्यात सर्वाधिक प्रकरणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असून त्यात १७८१ प्रकरणांमध्ये २७४ कोटींचे कर्ज वितरण झाले आहे. राज्यात हा उच्चांक आहे. तसेच पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत जिल्हात यंदा ६२५ चे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात ७६६ प्रकरणे मंजूर करण्यात आली.
पीक कर्ज नूतनीकरण आवश्यक
पीक कर्जासाठी जिल्ह्यात ४ लाख ९ हजार ५८५ खातेधारक आहेत. त्यांच्याकडे ३२५४ कोटी रुपये थकबाकी आहे. पीककर्ज नूतनीकरण करणे आवश्यक असून आतापर्यंत २ लाख २४ हजार २३४ खातेदारांनी १६१८ कोटींचे कर्ज नूतनीकरण केले आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आपले कर्ज नूतनीकरण करून या हंगामासाठी कर्ज घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.
पर्यटन क्षेत्रात महिला सक्षमीकरण
पर्यटन क्षेत्राला असलेला वाव पाहता, केंद्र शासनाच्या आई (AAI) या योजनेला चालना द्यावी. यात पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यवसायासाठी १५ लाखांपर्यंतचे कर्ज १२ टक्के व्याज सवलतीने दिले जाते. हे कर्ज फक्त महिला उद्योजकांना दिले जाते. या क्षेत्रात अधिकाधिक महिलांना वाव मिळण्यासाठी माविम सारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा.
बॅंकांची स्थिती
जिल्ह्यात एकूण ५०६ बॅंक शाखा आहेत. या सर्व बॅंकांमधून एकूण ५० हजार ४४८ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. ४३ हजार ५६० कोटींचे कर्ज वितरण झाले आहे. हे प्रमाण ८६.३५ टक्के आहे. सुक्ष्म व लघु उद्योग घटकांसाठी आतापर्यंत ३२५४ कोटींचे कर्ज वितरण झाले असून त्यापैकी १६१७ कोटींचे कर्ज थकित असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. विविध योजनांमध्ये कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या व पत पुरवठ्यात उत्तम कार्य करणाऱ्या बॅंकांना या वेळी प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.