Water Storage : खानदेशात जलसाठा वाढला

Khandesh Latest News : खानदेशात मागील तीन दिवसांतील पावसाने जलसाठा काहीसा वाढला आहे.
Water Storage
Water StorageAgrowon

Jalgaon News : खानदेशात मागील तीन दिवसांतील पावसाने जलसाठा काहीसा वाढला आहे. गिरणा नदीवरील नांदगाव (जि.नाशिक) येथील गिरणा धरणातील जलसाठा ५४ टक्के झाला आहे. जामनेरातील (जि.जळगाव) वाघूरमध्येही जलसाठा ८१ टक्के एवढा झाला आहे.

धरणांतील पाण्याची आवक मात्र कमी झाली आहे. फक्त तापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणातील पाण्याची आवक कायम आहे. वाघूरमधील जलसाठा सात ते आठ दिवसांपूर्वी सुमारे ६५ टक्के एवढा होता. त्यात बऱ्यापैकी वाढ झाली आहे.

गिरणा धरणातील जलसाठा मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस न झाल्याने फारसा वाढलेला नाही. त्यातील साठा मागील पाच - सहा दिवसात फक्त दोन टक्क्यांनी वाढला आहे. ६ ते ८ सप्टेंबरदरम्यान झालेल्या पावसात गिरणा धरणातील जलसाठा ३६ टक्क्यांवरून ५२ टक्के एवढा झाला होता. परंतु मागील आठवड्यातील पाऊस गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नव्हता.

Water Storage
Khandesh Rain Update : खानदेशात हलका ते मध्यम पाऊस

यामुळे धरणातील जलसाठा फारसा वाढला नाही. गिरणा धरणातून जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, पाचोरा, भडगाव ही शहरे, १०० गावे , नाशिकमधील मनमाड शहराला पिण्याचे पाणी दिले जाते. तसेच जळगाव जिल्ह्यातील २१ हजार हेक्टरवरील रब्बीलाही पाणी उपलब्ध होते. या धरणाची साठवण क्षमता १८.५० टीएमसी एवढी आहे.

हे धरण भरण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना किंवा गिरणा पट्ट्यात आहे. मागील चार पावसाळ्यांत गिरणा धरण १०० टक्के भरले आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये हे धरण १०० टक्के भरले होते.

वाघूर धरणातून जळगाव शहर, जामनेर शहर व इतर चार गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच जळगाव, भुसावळातील शिवारात रब्बीसाठीदेखील पाणी दिले जाते. हे धरणदेखील मागील वर्षी १०० टक्के भरले होते. यंदा या महिन्यातच त्यातील जलसाठा वाढला आहे.

Water Storage
Pune Rain Update : पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात हलक्या सरी

अनेर धरणातूनही विसर्ग

धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील सातपुडा पर्वतालगतचे अनेर धरणही ९३ टक्के भरताच त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. चार दरवाजे या प्रकल्पाचे उघडण्यात आले.

या धरणातून जळगाव जिल्ह्यातील चोपडा व धुळ्यातील शिरपुरातील सुमारे १५ गावांना रब्बीसाठी पाणी उपलब्ध होते. या धरणातही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हवा तसा जलसाठा नव्हता. परंतु सातपुड्यात चांगला पाऊस झाल्याने अनेरमधील जलपातळी वाढली आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र मध्य प्रदेशात सातपुडा पर्वत भागात आहे.

हे प्रकल्प भरले १०० टक्के

खानदेशात धुळ्यातील पांझरा, अनेर हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. नंदुरबारात दरा व देहली प्रकल्पात १०० टक्के जलसाठा आहे. जळगाव जिल्ह्यात जामनेरातील तोंडापूर, रावेरातील अभोडा, मंगरूळ, सुकी, यावलमधील मोर आणि लघु प्रकल्पांत निंबादेवी व गारबर्डी हे प्रकल्प देखील भरले आहेत.

या प्रकल्पात अल्प साठा

धुळ्यातील मालनगाव, बुराई, अमरावती, सोनवद, जळगाव जिल्ह्यातील मन्याड, अग्नावती, भोकरबारी, बोरी, अंजनी या प्रकल्पांत अल्प जलसाठा आहे. हे प्रकल्प महत्त्वाचे असून, त्यात पुरेसा जलसाठा नसल्याने पुढे टंचाई या धरणाच्या क्षेत्रात तयार होईल, अशी स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com