Nashik News : महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर राज्य शासनाच्या वतीने ‘उद्योगरत्न’ पुरस्कारांची घोषणा नुकतीच केली आहे. यामध्ये नाशिकमधील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना मराठी उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे.
पहिल्या ‘उद्योगरत्न’ पुरस्कारासाठी टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची निवड करण्यात आली असून, ‘सिरम इन्स्टिट्यूट’चे आदर पुनावाला यांना ‘उद्योगमित्र’, किर्लोस्कर उद्योग समुहाच्या संचालिका गौरी किर्लोस्कर यांना ‘महिला उद्योजक’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. २० ऑगस्ट रोजी मुंबई येथे हा पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.
विलास शिंदे यांना जाहीर झालेला पुरस्कार हा शेतकऱ्यांच्या सामूहिक शक्तीचा सन्मान आहे. एकत्र येऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून जागतिक दर्जाची ‘संस्था’ म्हणून सह्याद्री फार्म्स नावारूपास आली आहे. सह्याद्री आजमितीस भारतातील सर्वाधिक द्राक्ष निर्यात करणारी व विविध फळपिकात प्रक्रिया करणारी कंपनी म्हणून नावारूपास आलेली आहे.
नाशिक जिल्ह्यात मोहाडी (ता.दिंडोरी) येथे सुमारे १२० एकर क्षेत्रांवर विस्तीर्ण सह्याद्री फार्म्सने अत्याधुनिक एकात्मिक प्रकल्प उभारला आहे. त्यामधील सुविधा आणि यंत्रणा यांच्या आधारे ताजा शेतीमाल आणि प्रक्रियायुक्त शेती उत्पादने यांची ४२ देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होते. त्यातून जवळपास ६००० लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देण्यात ‘सह्याद्री’ यशस्वी झाली आहे.
२० ऑगस्ट रोजी मुंबई येथे वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आदींच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. रुपये पाच लाख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.