
Amravati News : कृषी विभाग व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत एका गोदामातून २ कोटी रुपयांचे खत जप्त करण्यात आले होते. प्रयोगशाळेतील पृथक्करणाअंती हे खत अप्रमाणित असल्याचे सिद्ध झाले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात कारवाई दरम्यान अप्रमाणित असल्याच्या संशयावरून एक पोते खत जप्त करण्यात आले होते.
याचा पुरवठा कोठून झाला याची चौकशी केली असता कृषी विभागाला माहुली जहागीर येथील खतसाठ्याची माहिती मिळाली. त्याआधारे १९ ऑगस्टला कारवाई करीत हा खतसाठा जप्त करण्यात आला. कृषी विभागाने केलेल्या या कारवाईनंतर या प्रकरणात पोलिस अधीक्षकांनी दुसऱ्याच दिवशी ३० पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या विशेष तपास पथकाची स्थापना केली.
या पथकाने जळगाव, मध्य प्रदेशातील जबलपूर या ठिकाणी जाऊन कारवाई केली आहे. जबलपूरमध्ये जप्त खत साठ्यांपेकी काही खतांचे उत्पादन सुरू असल्याचे लक्षात आल्यामुळे जबलपूरच्या कृषी सहसंचालकांनी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे जबलपूरला खत उत्पादकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
खरेदीदार शेतकऱ्यांना मोठा फटका
दरम्यान, पथकाने तेलंगणात जाऊनही काही कागदपत्रे जप्त केली आहेत. पोलिसांचा तपास अजूनही सुरूच आहे. दुसरीकडे खत अप्रमाणित असल्याचा प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे अशा अप्रमाणित खताची खरेदी करून त्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना पिकासाठी पोषक व आवश्यक घटक पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे या खताचा पिकांना पुरेसा फायदा होऊ शकत नाही, असे अहवालात समोर आल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.