
Pune News : टोमॅटो महाग झाल्यानंतर केंद्र शासनाने हस्तक्षेप करून टोमॅटो आयात केली. कांद्यावर निर्यात शुल्क लागू केले. टोमॅटो खरेदी करून ग्राहकांना अल्प दरात उपलब्ध करून दिले. आता टोमॅटोचे भाव मातिमोल झाले आहेत.
या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने किमान पंचवीस रुपये प्रति किलो या दराने टोमॅटो खरेदी करावीत. अन्यथा मुंबई येथे मंत्रालयावर टोमॅटो मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम व शिवसेनेचे तालुकाप्रमुख( ठाकरे गट) माऊली खंडागळे यांनी दिला आहे.
शेतकरी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी सोमवारी (ता.१८) नारायणगाव येथील टोमॅटो बाजारात माजी सभापती देवदत्त निकम, तालुकाप्रमुख खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटना व शेतकरी यांची बैठक घेण्यात आली.
यावेळी मंत्रालयावर टोमॅटो मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. बैठकीला शेतकरी संघटनेचे प्रमोद खांडगे, सचिन थोरवे, संदेश खंडागळे, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामभाऊ वाळुंज, बाजार समितीचे संचालक सारंग घोलप आदी मान्यवर टोमॅटो उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
देवदत्त निकम म्हणाले, की शेतकरी हितासाठी व विकासासाठी मंत्रिमंडळात सहभागी झालो असल्याची माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील देत आहेत. त्यांचे व पंतप्रधानांशी चांगले संबंध आहेत. यामुळे सहकार मंत्री वळसे पाटील, आमदार अतुल बेनके यांनी पंतप्रधान व केंद्रीय कृषिमंत्री यांची भेट घेऊन कांदा उत्पादक व टोमॅटो उत्पादकांचे प्रश्न सोडवावेत.
निकम पुढे म्हणाले, की केंद्रात व राज्यात घोषणा करणारे व शेतकरी विरोधी सरकार आहे. जुन्नर व मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीची कांदा अनुदानाची सुमारे १९ कोटी रुपयांची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. नाफेडमार्फत चोवीस रुपये दहा पैसे दराने कांदा खरेदी करण्याची घोषणा केली. मात्र अद्याप कांदा खरेदी सुरू केली नाही.
टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर शासनाने टोमॅटो खरेदी केली. मात्र भाव कमी झाल्यानंतर कोणती उपाययोजना केली जात नाही. शासनाने टोमॅटो उत्पादकांना अनुदान द्यावे. २५ रुपये प्रति किलो या दाराने टोमॅटो खरेदी करावीत. अन्यथा मुंबई येथे मंत्रालयावर टोमॅटो मोर्चा काढण्यात येईल.
खंडागळे म्हणाले, की शेतकऱ्यांना भीक नको. त्यांना त्यांच्या घामाचे मोल मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम मंत्री करत आहेत.
राज्याचे कृषिमंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर टोमॅटो नारायणगाव येथे विक्रीसाठी घेऊन येण्याची वेळ आली आहे. भांडवली खर्च विचारात घेता टोमॅटो क्रेटला किमान ४०० ते ५०० रुपये भाव मिळणे आवश्यक आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे खांडगे, वाळुंज, थोरवे यांनी मनोगत व्यक्त केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.