
नाशिक : ‘एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम (Ek Divas Balirajasathi) सुरू झाल्यानंतर गुरुवारी (ता. १) विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिंडोरी तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. या दौऱ्यात शेतकऱ्यांनी भेडसावणाऱ्या प्रश्नांचा पाढाच वाचून दाखविला. शेतीप्रश्नांची (Agriculture Issue) सोडवणूक करण्यासाठी कृषी विभागाने पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी या वेळी व्यक्त केली.
तालुक्यातील वारे, वणारे, शिंदपाडा, दहीवी, कोशिंबे, देवपाडा येथे श्री. वाघ यांनी भेटी दिल्या. या वेळी तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, कृषी पर्यवेक्षक सुधाकर ठोकळे, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रमोद अहिरराव यांसह क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. या भेटीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याशी अभियानाबाबत चर्चा करून आंब्याची बांधावरील घनलागवडीची पाहणी करण्यात आली. महिलांची शेतीशाळा, पीक प्रात्यक्षिके, अवजारे, कांदाचाळ, वीजपुरवठा, पीकविमा अशा विविध विषयांवर शेतकऱ्यांशी संवाद साधून चर्चा त्यांनी केली. शेतकऱ्यांनी विविध समस्या मांडल्या.
गावातील शेतकरी मृत झाल्यास वारसाची नोंद महसूल विभागाने लवकर करावी, पीएम किसान योजनेचा लाभ लवकर मिळेल याकडे लक्ष वेधले. सध्या शेतीमालास अपेक्षित भाव मिळत नसल्याने वीजबिल भरता येत नाही. मागील कर्जमाफीत २ हेक्टरच्या आतील कर्जदार बँकेच्या चुकीमुळे लाभापासून वंचित आहेत. असे असताना आदिवासी शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. स्टील, सिमेंट, पत्रा, मजुरी, वाहतूक यांचा खर्च वाढल्याने कांदा चाळ अनुदानाच्या मर्यादा वाढवाव्यात. काही द्राक्ष निर्यातदार ठरल्या भावाने व वेळेवर पेमेंट देत नाही. त्यामुळे पीककर्ज वेळेवर भरता येत नाही. त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना द्राक्ष निर्यातदार करण्यास शासन स्तरावरून प्रोत्साहन मिळावे, अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.