
Cashew Processing Industry रत्नागिरी ः आर्थिक पाठबळ नसल्यामुळे कोकणातील १ लाख ८१ टन उत्पादनापैकी ७० टक्के काजू बी प्रक्रियेसाठी (Cashew Nut Processing) परराज्यात पाठविले जाते. भांडवलाअभावी कोकणातील कारखानदारांना काजू बी साठवण (Cashew Nut Storage) करता येत नाही. याबाबत बँकांचे धोरण (Bank Policy)उदासीन आहे. प्रक्रियादारांसाठी केरळच्या धर्तीवर धोरण राबविणे आवश्यक आहे, अशी मागणी काजू प्रक्रियाधारकांकडून करण्यात आली आहे.
काजू प्रक्रियाधारक संघाचे अध्यक्ष विवेक बारगिर, उपाध्यक्ष प्रताप पवार, सचिव संदेश पेडणेकर यांनी पत्रकारांना कोकणातील काजू व्यावसयाची माहिती दिली. काजू उद्योगातून सुमारे तीन हजार कोटींहून अधिक उलाढाल होते.
केरळमध्ये काजू उद्योग घराघरात आहे. शंभर किलो प्रक्रिया करणाऱ्या काजू उद्योगातून सहा महिलांना रोजगार मिळतो. कोकणात काजूची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे; परंतु येथील उत्पादित होणारे काजू बी परराज्यात प्रक्रियेसाठी पाठविले जाते.
गावागावात बी संकलित केले जाते, पण व्यावसायिक ते विकत घेऊन परराज्यातील कंपन्यांना देतात. स्थानिक प्रक्रियादारांची काजू बी विकत घेण्याची आर्थिक क्षमता नसते.
त्यामुळे एक लाख ८१ हजार टन काजू बी उत्पादनापैकी अवघ्या तीस टक्के बीवर कोकणातील कारखान्यात प्रक्रिया केली जाते. बँकांच्या उदासीन धोरणामुळे कर्ज उपलब्ध होत नाही. यासाठी राज्य शासनाने धोरण ठरविले पाहिजे.
तरच येथील उद्योग वाढतील. सध्या महाराष्ट्रात विविध प्रकारचे मोठे उद्योग आणण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत.
तसेच प्रयत्न काजू बीवरील प्रक्रिया उद्योगांसारख्या शाश्वत रोजगार देणाऱ्या कारखान्यांसाठी केले तर काजू उद्योगाला चांगले दिवस येतील. त्यासाठी काजू कारखाने जगवा हे धोरण अवलंबावे लागणार आहे.
कोकणातील काजूची गुणवत्ता चांगली असल्यामुळे जगभरातून मागणी आहे. त्यादृष्टिने शासनाने नियोजन करायला हवे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
सुकलेल्या काजू बीचा अभाव
गावागावातून गोळा करण्यात येणारे काजू बी पूर्णतः सुकलेले नसते. त्यामुळे दर्जा घसरतो आणि किलोचा दरही शेतकऱ्यांना पाच ते दहा रुपयांनी कमी मिळतो. त्यासाठी फेरीवाल्यांना काजू बी देताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.
‘ओला काजूगर टिकवून ठेवण्यावर भर हवा’
गेल्या काही दिवसांत ओले काजू गर विक्री व्यावसायातून लाखो रुपयांची उलाढाल होते. हॉटेल उद्योगात याचे महत्त्व लक्षात घेऊन ओले काजू बी वर्षभर वापरण्यास मिळावे यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे.
हा काजू सहा महिन्यांहून अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी अभ्यास झाला तर शेतकऱ्याला अधिक नफा मिळवता येईल, असे बारगिर यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.