
Nagpur News : शहरात पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा भरवण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या परंपरेला, लाकडी बैलाच्या (तान्हा) पोळ्याला यंदा २१७ वर्षे पूर्ण होत आहेत. राजे मुधोजी महाराज भोसले यांनी ही प्रथा आजही कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे विदर्भ वगळता अन्यत्र कोठेही अशा प्रकारचा तान्हा पोळा साजरा केला जात नाही.
दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांनी सन १८०६ मध्ये हा उत्सव सुरू केला. लहान मुलांना बैलांचे महत्त्व कळावे, असा उद्देश त्यामागे होता. रघुजी महाराज भोसले यांनी लाकडी बैल तयार करून मागविले व सर्व लहान मुलांना ते वाटण्यात आले.
जिवंत बैलांप्रमाणे त्यांना सजविण्यात आले. आंब्याचे तोरण लावून त्याला जिलेबी, फळे आता चॉकलेट, बिस्कीट अशा वस्तू लटकविण्यात येतात. त्यामध्ये मुलांना उभे करून त्यांच्याकडील लाकडी बैलाची पूजा केली जाते.
पूजा संपल्यानंतर तोरण तोडून पोळा फोडून वाजतगाजत हनुमान खिडकीचे दर्शन घेऊन हनुमानाला नारळ फोडत आल्यावर मुलांना खाऊ, पैसे वाटण्यात यायचे. या प्रथेला २१७ वर्षे पूर्ण होत आहेत.
राजे मुधोजी महाराज भोसले यांच्या वाड्यात आजही सर्वात मोठा लाकडी बैल आहे. त्याची उंची आठ फूट, तर लांबी सहा फूट असून बैलाच्या पायात चांदीचा तोडा घातला आहे. पूर्वी ज्याप्रमाणे राजे रघुजी भोसले वाजत गाजत मिरवणूक काढायचे त्याच परंपरेला अनुसरून यंदाही शुक्रवारी (ता.१५) मिरवणूक काढण्यात येणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.