
Jalgaon News : पावसाळ्यात उन्हाळ्यासारखे तापमान तयार होत आहे. मागील दोन दिवस कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. मागील तीन - चार दिवसांपासून सकाळी दहापासूनच उन्हाचे असह्य चटके सुरू झाले होते.
त्यात वीजपुरवठा बंद झाल्याने अधिकच उकाडा जाणवू लागला आहे. येत्या ४ सप्टेंबरपर्यंत तापमानात वाढ होऊन ते ३५ अंशांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढत आहे. कारण पाऊस कमी आहे. काही भागांत पिके हातची गेली आहेत.
केळी, कापूस उत्पादकांनी सिंचनासंबंधी कार्यवाही सुरू केली आहे. केळीला मागील तीन दिवस रोज दोन तास पाणी दिले जात आहे. मध्यम, हलक्या जमिनीतही कृत्रीम जलसाठाधारक शेतकऱ्यांनी कापसाला एक ते दीड तास सिंचन केले आहे. दुपारी १२ ते चार या काळात चटके अधिक असतात.
यंदा जूनमध्ये पाऊस नव्हता. २५ जून रोजी काही भागांत पाऊस झाला. ६ जुलै रोजी खानदेशात अनेक भागांत पेरणीयोग्य पाऊस झाला. पेरण्या केल्या. जुलैमध्ये पाऊसमान बरे होते. जळगाव जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला आहे. धुळ्यात ५२ टक्के आणि नंदुरबारातही सुमारे ५५ टक्के पाऊस झाला आहे.
६ ऑगस्टपासून पाऊस कमी आहे. काही भागांत पाऊसच नाही. मध्यंतरी दोन- तीन वेळा जोरदार पाऊस झाला. मात्र तो काही तासांपुरताच राहिला. ग्रामीण भागात अघोषित भारनियमन सुरू झाले आहे. कुठल्याही वेळेस वीजपुरवठा खंडित केला जातो. यामुळे अडचणी वाढत आहेत.
पिकांना प्रतीक्षा
पावसाच्या ओढीने खरिप पिकांना मोठा फटका बसला आहे. जमिनीत भेगा पडून पिके सुकू लागली आहेत. पिकांची वाढ खुंटली आहे. हा महिना खरीप पिकांना शेंगा, फुले येऊन पिके परिपक्व होण्याचा आहे. असे असताना एक ते दीड फूटच पिकांची वाढ झाली आहे. शेतकरी केव्हा पाऊस येईल यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.