
औरंगाबाद : ‘‘वर्तमान काळात शेती अडचणीत येत आहे. शेतीसमोरील अडचणी (Agriculture Issues) दूर करायच्या असतील, तर सेंद्रिय पद्धतीच्या (Organic Farming) शाश्वत शेतीचा (Organic farming) आधार घ्यावा लागेल.
‘शाश्वत शेती विश्वासभाऊंची’ या पुस्तकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हा आधार मिळेल,’’ असे प्रतिपादन कृषिभूषण विजयअण्णा बोराडे यांनी शनिवारी (ता.१४) केले.
‘सकाळ ॲग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनात (Agrowon Agricultural Exhibition) ( लोहारा (जि. जळगाव) येथील प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी विश्वासराव पाटील यांच्या शाश्वत शेतीवर आधारित ‘ॲग्रोवन’चे मुख्य उपसंपादक अमित गद्रे लिखित ‘शाश्वत शेती विश्वासभाऊंची’ या पुस्तक प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी बोराडे म्हणाले, ‘सकाळ प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित केलेले हे पुस्तक कोरडवाहू शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल. पाटील यांनी शाश्वत शेतीच्या दृष्टिकोनातून हरभरा, ज्वारी व अन्य पिकांमध्ये अनेक प्रयोग केले. ते सर्व मार्गदर्शक आहेत.
प्रत्येक प्रयोगामध्ये वैशिष्ट्य जोपासण्याचे काम केले आहे. त्याची दखल सकाळ प्रकाशनाने घेतली.
विश्वासराव पाटील म्हणाले, की आपल्याला पारंपरिक शेतीशिवाय पर्याय नाही. आपण कुठेही फिरलो तरी आपल्याला पुन्हा पारंपरिक शेतीजवळच यावे लागेल. आपण शेती कळली असा दावा करत असलो तरी शेवटपर्यंत कळत नसते.
मलाही नाही कळाली. एका बाजरीत इतके प्रकार असतात, की एखादा प्रकार आपल्याला समजून घेता येतो. माझ्या प्रयोगांची दखल ॲग्रोवनने घेतली आणि सकाळ प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला.
या पुस्तकाचे लेखक अमित गद्रे यांनी प्रत्यक्ष शेती पाहून आणि चर्चेतून लेखन केले आहे. सोनार ज्याप्रमाणे सोन्याला कसोटीवर उतरवतो त्या पद्धतीने हे पुस्तक कसोटी लावून शेतकऱ्यांसमोर आणले आहे.
‘ॲग्रोवन’चे संपादक-संचालक आदिनाथ चव्हाण प्रास्ताविकात म्हणाले, ‘सेंद्रिय शेतीचे जर उत्तम प्रयोग पाहायचे असतील, तर लोहारा येथे जावे लागेल. रासायनिक शेतीकडे आपण वळल्यानंतर सेंद्रिय शेती आता संपत चालली असताना उत्तम पद्धतीची शेती कशी होती ती येथे पाहायला मिळते.
विश्वासभाऊ हे सेंद्रिय पद्धतीने जगणारी व्यक्ती आहेत. आदर्श कुटुंब पद्धती कशी असावी हे त्यांच्या घराकडे पाहून आपल्याला कळते. विश्वासभाऊंसारखी माणसे ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून आम्ही समाजासमोर आणू शकलो याचा आनंद आहे.’’
पुस्तकाचे लेखक अमित गद्रे म्हणाले, ‘‘पुस्तकी ज्ञानापलीकडे शेतीचे वास्तवातील धडे विश्वासराव पाटील यांच्यासारख्या शेतकऱ्यांमुळे मिळाले, हे पुस्तक लिहायची संधी मला मिळाली, त्यानिमित्ताने पाटील यांची शेती प्रत्यक्ष पाहता आली.
गेल्या ५० -६० वर्षांचा त्यांचा शेतीतील अनुभव त्यांनी या पुस्तकातून शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे.’’ सकाळ प्रकाशनाच्या सहसंपादक दीपाली चौधरी यांनी प्रकाशनामागील भूमिका स्पष्ट केली. या वेळी सकाळ प्रकाशनाचे सरव्यव्यवस्थापक आशुतोष रामगीर प्रमुख उपस्थित होते.
कोरडवाहू शेती प्रयोगाचे पर्यटन
‘‘विश्वासभाऊ पाटील यांची कोरडवाहू शेती अधिक समृद्ध होण्याचे कारण म्हणजे त्यांचे एकत्र कुटुंब होय. त्यांच्याबरोबर एखादा दिवस घालवणे म्हणजे ते कोरडवाहू शेतीतल्या प्रयोगाचे पर्यटन होऊ शकते,’’ असेही विजयअण्णा बोराडे म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.