Bhandara News कीड-रोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याने मिरची पिकातून अपेक्षित उत्पादकता आणि उत्पन्नाचा पल्ला गाठता आला नाही. परिणामी, मोहाडी तालुक्यातील सालेबर्डी गावच्या शेतकऱ्यांनी वेगळी वाट चोखाळत तब्बल १४ एकरांवर सूर्यफुलाची लागवड (Sunflower Cultivation) केली आहे. या पिकातून चांगला परतावा मिळेल, अशी अपेक्षा त्यांना आहे.
शेतकरी राजेंद्र ठवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यासह गावातील बहुतांश शेतकरी मिरची लागवड करतात. गेल्या वर्षीदेखील मिरची लावली होती. मात्र या पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्न, खर्चाचा ताळेबंद जुळला नाही. परिणामी, पर्यायी पिकाचा शोध सुरू केला.
२००८ मध्ये सूर्यफुलाची लागवड करून कळमना बाजारात विक्री केली होती. हा अनुभव पाठीशी असल्याने सूर्यफूल लागवडीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे त्यानुसार राजेंद्र ठवकर सात एकर, विकास ठवकर चार एकर, तर पोलिस पाटील नाना ठवकर यांनी तीन एकर याप्रमाणे गावात १४ एकरांवर सूर्यफूल लागवड आहे.
या पिकातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता असल्याने पुढील वर्षी पुन्हा या पिकाच्या लागवडीवर भर देऊ, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
एकरी सात ते आठ क्विंटलची अपेक्षा
‘‘सूर्यफूल बियाणे खानदेशातून आणले. वाणाच्या दर्जानुसार ११०० रुपये आणि १३५० रुपये किलो याप्रमाणे दर होता. या पिकासाठी एकरी दोन किलो बियाण्यांची गरज भासते.
तर लागवड डिसेंबर २०२२ मध्ये केली. आता १५ ते २० एप्रिल दरम्यान हे पीक काढणीस येईल. एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादकतेची अपेक्षा आहे.
सध्या ८ ते ९ हजार रुपये क्विंटलचा दर आहे. पिकाच्या व्यवस्थापनावर एकरी सरासरी १० हजार रुपयांचा खर्च होतो,’’ असे राजेंद्र ठवकर यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.