
Yavatmal News : अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने स्वतःच्या मुलाच्या हातानेच चिठ्ठी लिहिली होती. त्यात सावकाराच्या जाचाचा उल्लेख असतानाही पोलिसांकडून याप्रकरणी कारवाई होत नसल्याचा आरोप सावकारग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने केला आहे.
राळेगाव तालुक्यातील शेळी (माड) गावचे शेतकरी अरुण नांदे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आजारपणासाठी २०१३ मध्ये राळेगाव येथीलच एका अवैध सावकाराकडून दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या बदल्यात त्यांनी तीन एकर शेतीची खरेदी करू दिली.
पैसे परत मिळाल्यावर जमीन परत करू असा शब्द सावकाराने दिला होता. त्यानुसार पुढील पाच वर्षांत सावकाराची रक्कम मुद्दल आणि व्याजासकट परत करण्यात आली. मात्र त्यानंतरही सावकाराने जमीन परत करण्यास नकार दिला.
विशेष म्हणजे जमीन अरुण नांदे यांच्या कुटुंबीयांच्या वहितीतच आहे. परंतु सरकारकडून मिळणारी नुकसान भरपाई व इतर लाभ सावकाराला मिळत होते. मृत्यूपूर्वी काही दिवस आधी सावकाराने शेतात येऊन अरुण नांदे यांना मारहाण केली होती. मुलासमक्ष झालेल्या मारहाणीमुळे ते व्यथित झाले. त्यातूनच त्यांनी १३ ऑगस्ट रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली.
विशेष म्हणजे मृत्यूपूर्वी त्यांनी सातवीत असलेल्या आपल्या मुलाच्या हातानेच चिठ्ठी लिहिली. त्यामध्ये सावकारी छळाचा उल्लेख करण्यात आला आहे. याप्रकरणी राळेगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र त्यावर अद्याप कोणतीच कारवाई पोलिसांनी केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.