
Gadchiroli News : सध्या राज्यात अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) तांडव सुरू असताना देसाईगंज तालुक्यात वीज कोसळून अख्खं शेतकरी कुटुंबच ठार झाले. ही घटना वडसा-कुरखेडा मार्गावरील दूध डेअरी (तुळशी फाटा) जवळ सोमवारी (ता. २४) सायंकाळी ५ वाजता घडली. या घटनेमुळे अवघे समाजमन सुन्न झाले आहे.
भारत लक्ष्मण राजगडे (वय ३२, रा. आमगाव, ता. देसाईगंज), त्यांची पत्नी अंकिता राजगडे (वय ३०) हे दोघेही पती-पत्नी आपल्या दिव्यांशी ( वय ५) व मनस्वी (वय ३) या कोवळ्या लेकरांसह मृत्यूमुखी पडले.
राजगडे कुटुंब गरगळा येथून लग्न लावून येत असताना मार्गातच हलक्या पावसाची सुरुवात झाली. लगेच विजांचा कडकडाट सुरू झाला.
वीज कडाडत असल्याने राजगडे कुटुंबाने दूध डेअरी जवळ एका झाडाखाली आश्रय घेतला. पण अचानक वीज अंगावर कोसळल्याने कुटुंबातील चारही जण जागीच ठार झाले.
या घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून चारही जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पुढील तपास पोलिस निरीक्षक रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.