
Kolhapur News : राज्यात ऊस पट्ट्यात अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने पुढील वर्षी ऊस उत्पादन व साखरनिर्मितीत घटीची टांगती तलवार कायम आहे.
दक्षिण महाराष्ट्रासह, सोलापूर व मराठवाड्यातील बहुतांश ऊस पट्ट्यात समाधानकारक पाऊस अद्याप सुरू झाला नाही. याचा फटका उस उत्पादनाला बसण्याची शक्यता असल्याचे राज्याच्या विविध भागांतील कारखाना प्रतिनिधींनी सांगितले.
राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४० हजार हेक्टरची वाढ दिसत असली तरी सध्याचे वातावरण पहाता उत्पादनाच्या पातळीवर सध्या तरी फारशी समाधानकारक परिस्थिती नसल्याचे चित्र आहे.
राज्यात कोल्हापूर विभागात उस उत्पादन व साखर उत्पादन सर्वाधिक असते. उसाच्या वाढीसाठी जोरदार वळीव पाऊस व पावसाळ्यात थांबूनथांबून वृष्टी आवश्यक असते. तोडणीच्या अगोदर तीन ते चार महिने तरी ठराविक कालावधीनंतर पाऊस आवश्यक असतो. मे मध्ये वळीव पाऊस त्या पाठोपाठ मोसमी पाऊस झाल्यास उसाची वाढ चांगली होते.
यंदा वळीव पावसाने दक्षिण महाराष्ट्राला हुलकावणी दिली. कडक उन्हाळा, नद्या, विहिरींतील घटलेले पाणी यामुळे ऐन उन्हाळ्यात उसाला पाण्याचा मोठा ताण बसला. जूनमध्ये वेळेवर पाऊस सुरू झाला असता तर काही प्रमाणात उसाच्या वजन वाढीची शक्यता होती.
पूर्ण जून महिना उन्हाळा सदृष्य वातावरण राहिले. यामुळे उसाची अपेक्षित वाढ झाली नाही. जुलैचा मध्य आला तरी दक्षिण महाराष्ट्रातील उच्चांकी उत्पादन देणारा हा पट्टा अद्याप पाण्यासाठी तहानलेला आहे. यामुळे या भागातील उसाची वाढ अपेक्षित झाली नसल्याचे चित्र आहे.
सोलापूर, मराठवाड्यातही धाकधुक
२०२१-२२ मध्ये सोलापूर, मराठवाड्याचा हंगाम जूनपर्यंत चालला होता. २०२२-२३ मध्ये तब्बल एक महिना अगोदरच हंगाम संपला. यंदाही या भागात काही प्रमाणात क्षेत्र वाढले असले तरी पावसाअभावी उत्पादन घटीची भीती कायम आहे.
या भागातील कारखानदार पुढील हंगामाचा अंदाज शेतकऱ्यांशी बोलून घेत आहेत. पण पाण्याची समस्या गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याने यंदाही उसाच्या उत्पादनात घटीची शक्यता आहे.
साखर निर्मितीही घटणार
असाच पावसाचा ताण राहिला तर येणारा हंगामही लवकर आटपण्याची शक्यता असल्याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले. याचा फटका साखर उत्पादनालाही बसू शकतो. यामुळे राज्याचे साखर उत्पादन १०० लाख टनांपर्यंत कसेबसे पोहोचू शकेल, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे.
नव्या लागवडीही धीम्या गतीने
पावसाचा अंदाज येत नसल्याने उसाच्या नव्या लागवडीही मंदगतीने होत आहेत. विशेष करून दक्षिण महाराष्ट्रात ज्या वेगाने लागवडी अपेक्षित होत्या त्या वेगात त्या होत नसल्याचे चित्र आहे. अनेक शेतकरी स्वतःकडील पाण्याची उपलब्धता पाहूनच ऊसलागवड करत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.