
Pune News : भोर प्रांतातील दुर्गम भागातील एक शेतकरी मुलगा दहावी उत्तीर्ण होताच उदरनिर्वाहासाठी मुंबईत जातो. तेथे तो प्लंबर बनतो. माथाडी कामगार युनियनमध्ये काम करतो. तरीही परवडत नाही म्हणून २७ वर्षे रिक्षा चालवतो. मात्र, तो गावाशी नाळ तोडत नाही. एक दिवस महानगर कायमचे सोडून पुन्हा गावात येतो आणि राज्य शासनाचा ‘सुधारक सन्मान’ मिळवितो. ही अनोखी कहाणी आहे भागूजी हरिभाऊ चिकणे या जिद्दी शेतकऱ्याची.
राज्याच्या महिला आर्थिक विकास महामंडळाने महिला सक्षमीकरणात पुरुषांच्या सहभागाबद्दल दिला जाणारा २०२३ चा ‘सुधारक सन्मान’ महाबळेश्वर पर्वतरांगांमधील कोर्ले गावाचे शेतकरी भागूजी चिकणे (वय ५२) यांना जाहीर केला आहे. त्यामुळे ते पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनले. “आम्ही चार भाऊ.
पण, या डोंगरदऱ्यांमध्ये पोट कसे भरणार हा प्रश्न होता. त्यामुळे माझे मोठे भाऊ मुंबईला गेले आणि माथाडी कामगार झाले. मी दहावी होताच त्यांनी मला मुंबईला नेले. तेथे मी दोन वर्षे प्लंबरचे काम केले. त्यानंतर माथाडी युनियन कार्यालयात पाच वर्षे पडेल ते काम केले. परंतु, उदरनिर्वाह होत नव्हता. शेवटी रिक्षाचालक बनलो आणि २७ वर्षे रिक्षा चालवली,” असे भागूजी म्हणाले.
एक दिवस मुंबई सोडून तडक रिक्षा घेऊन भागूजी गावच्या शेतात हजर झाले. ते म्हणाले, “कोरोना काळात मुंबई बंद होती. मी गावाला आलो. इकडे पैसा नाही. पण, या सह्याद्रीतील पर्यावरण, निसर्ग मला भावला.
मला शहरात जावेनासे वाटू लागले. पत्नी, एक मुलगा, एक मुलगी यांना घेऊन मी कायमचा या गावात शेतीत परतलो. कुटुंब केवळ शेतीवर जगू शकणार नाही. त्यामुळे मी कुक्कुटपालन सुरू केले. मुंबईतील पुंजी शेतात टाकली. साडेसहा लाखांचा कुबोटा ट्रॅक्टर घेतला. आता आधुनिक शेतीचे प्रयोग सुरू आहेत.”
मुंबई अचानक सोडण्यामागे भागूजींची आधीपासून गावाशी असलेली नाळदेखील कारणीभूत आहे. “खरं म्हणजे मी मुंबईत नुसता शरीराने वावरत होतो. माझे चित्त गावशिवारात असायचे. गावाच्या विकासासाठी मी मुंबईतून गावकऱ्यांना मदत, मार्गदर्शन करीत असे. गावाचा अखंड हरीनाम सप्ताह, जत्रा, धार्मिक कार्यक्रमात सहभाग असायचा.
गावातील दिव्यांग, परितक्त्या महिलांना मदत, बचत गटांची बांधणी, शेतकऱ्यांना मदत, बेघरांसाठी घरकुले होण्यासाठी धडपड सुरु असायची. गावातील तंटेदेखील मी मुंबईतून सोडवायचो. झाले असे की गेल्या वर्षी गावच्या तंटा मुक्ती समितीचे अध्यक्षपद गावाने मला एकमताने बहाल केले. आतापर्यंत मी जवळपास २० तंटे सोडविले आहेत. आता मी गावात समाधानी आहे,” असे भागूजींनी सांगितली.
‘समाजकार्यातून जपतो वंशजांचा वारसा’
‘‘गावातील शेतीपूरक विकासासाठी कामे करण्याचे माझे ध्येय आहे. शहरात पैसा आहे; पण सुख नाही. त्यामुळे युवकांनी गावासाठी पुढे आल्यास गावांचा चेहरामोहरा बदलू शकतो. मला कोणतेही व्यसन नाही. मी शेतात कामे करतो. उरलेला वेळ गावासाठी देतो. पूर्ण शाकाहारी निरामय जीवन मी जगतो.
शिवरायांच्या काळात केंजळगडाच्या रक्षणाचे काम आमच्या चिकणे घराण्याकडे होते. आमच्या वंशजांनी तलवारीच्या जोरावर गावाचे रक्षण केले. त्याच पिढीचा मी प्रतिनिधी असल्यामुळे आता समाजकार्याच्या माध्यमातून गावाचे रक्षण करावे, अशी माझी धारणा आहे,’’ असे चिकणे यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.