
Akola News : ‘‘ विद्यार्थ्यांनी काळानुरूप आणि परिस्थितीजन्य नावीन्यपूर्ण संशोधन, प्रयोग करणे आवश्यक आहे. ज्यायोगे कृषी क्षेत्राचे बळकटीकरण करणे आणि शाश्वतता आणणे शक्य होईल,’’ असे मत संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना मिळावी, नाविन्यता, कौशल्य तसेच सांघिक भावना वाढीस लागावी या दृष्टीने आविष्कार संशोधन महोत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. राज्यपालांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या शैक्षणिक उपक्रमाचे यावर्षी सुद्धा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजन करण्यात आले.
संशोधन महोत्सवात विद्यापीठ क्षेत्रातील १२ महाविद्यालयांतील २६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या महोत्सवाचा उद्घाटनपर कार्यक्रम विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. श्यामसुंदर माने यांच्या अध्यक्षतेत झाला. डॉ. विलास खर्चे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे, पदव्युत्तर शिक्षण संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ययाती तायडे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप हाडोळे, आविष्कार आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अभय वाघ उपस्थित होते.
डॉ. माने यांनी विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रम करतानाच संशोधनाची भावना जपण्याची गरज व्यक्त केली. तसेच त्यांनी विविध शैक्षणिक क्रांतीचे दाखले देत कृषी क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्ण संशोधनाची गरज आणि प्रत्येकाचे कर्तव्य आणि जबाबदारी या बाबत मत व्यक्त केले.
डॉ. तायडे यांनी कृषी क्षेत्रातील संशोधनाची गरज, आविष्कार संशोधन महोत्सव आयोजित करण्यामागील संकल्पना आणि उपलब्ध संधी याबाबत मार्गदर्शन केले. महोत्सवाला विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १२ महाविद्यालयांतील २६ विद्यार्थ्यांनी अतिशय नावीन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण केले. या महोत्सवात विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक उपस्थित होते. डॉ. मोहिनी डांगे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नितीन कोंडे यांनी आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.