
Solapur News : आयुष्यभर शेतकरी, शेतमजूर, कामगार, वंचित घटकांच्या विकासासाठी आग्रही राहिलेले शेकापचे ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुख यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही, त्यांच्या विचारात आणि कृतीत स्पष्टता होती. त्यांच्यासारखा आदर्श आणि प्रामाणिक राजकारणी आज दुरापास्त आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गणपतराव देशमुखांविषयीच्या आठवणी जागवल्या.
सांगोला येथे ज्येष्ठ नेते स्व. गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि महाविद्यालयाचा नामातंर कार्यक्रम श्री. पवार यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
त्या वेळी ते बोलत होते. या वेळी गणपतराव देशमुख यांच्या पत्नी रतनबाई देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष रामराजे निंबाळकर, खासदार संजय पाटील, खासदार रणजितसिंह नाईकनिंबाळकर, आमदार बबनराव शिंदे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार बाळाराम पाटील, आमदार संजय शिंदे, आमदार शहाजी पाटील, आमदार यशवंत माने, डॉ. अनिकेत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, की भाई देशमुख १९६२ मध्ये विधानसभेत पहिल्यांदा निवडून आले. मी १९६७ साली विधानसभेत निवडून आलो. त्यांच्या कामाची पद्धतच वेगळी होती. दुष्काळी सांगोल्याचे ते नेतृत्व करत आले. सांगोल्यासह जत-आटपाडी या दुष्काळी पट्ट्याच्या पाणीप्रश्नावर ते कायम आग्रही राहिले. खरे तर हा भाग माणदेश म्हणून ओळखला जातो.
माणदेशी माणसे पूर्वीपासून कष्टकरी, प्रामाणिक आणि धाडसी राहिलेली आहेत. इथल्या परिस्थितीमुळे बाहेरच्या राज्यात पोटासाठी इथली माणसे गेली. देशाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला माणदेशी माणसे भेटतील. आज ती तिकडे जाऊन विविध व्यवसायातून सन्मानाने जगत आहेत, हा इथल्या मातीचा गुण आहे. डाळिंबामध्ये सांगोल्याने मोठी क्रांती केली. गणपतरावांच्या प्रयत्नाचा मोठा वाटा त्यात आहे, असेही ते म्हणाले.
श्री. फडणवीस म्हणाले, की राज्यातील शेतकरी कष्टकरी आणि वंचित लोकांच्या हक्कासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांची दुष्काळी जनतेबद्दल असलेली तळमळ पाहूनच आपण सामान्य लोकांच्या समस्या मांडायला शिकलो. विदर्भाच्या सिंचन योजनावार आवाज उठवत असताना अनेकवेळा गणपतराव देशमुख यांनी आपल्याला मार्गदर्शन केले.
विधिमंडळ आवारात प्रेरक स्मारक उभारू
गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या विधिमंडळ आवारातील स्मारकाचाचा प्रश्न या वेळी उपस्थित केला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, की विधिमंडळाची रचना अशी आहे की, छ्त्रपती शिवाजी महाराज वगळता कोणताही पुतळा त्या आवारात ठळकपणे दिसत नाही. त्यामुळे देशमुख यांचा पुतळा किंवा स्मारकाचा विषय अर्धवट राहिला आहे. लवकरच विधिमंडळ परिसरात देशमुख यांचे, असे स्मारक बनवू, ज्यातून प्रत्येकाला प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल, असेही फडणवीस म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.