
जळगाव ः थकबाकी वसुलीसंबंधी जिल्ह्यात कृषिपंपांची (Agriculture Pump) वीजजोडणी (Power Connection) किंवा संयोजन तोडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे ऐन हंगामात शेतकरी संकटात सापडले आहेत. वीज तोडू नये यासाठी शेतकऱ्यांनी मध्यंतरी राज्य अन्न सुरक्षा आयोगाच्या (National Food Security Commission) आदेशांबाबत जनजागृती केली. तसेच आयोगाने कृषिपंपांची वीज तोडू नये, असे बजावले आहे. शासनालाही तशा सूचना केल्या आहेत. तरीदेखील वीज तोडण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.
यासंदर्भात नुकतेच वीज वितरण कंपनीच्या जळगाव शहरातील कार्यालयात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यात अनेक शेतकरी सहभागी झाले. मागील वर्षीदेखील असाच त्रास वीज कंपनीने दिला होता. तसाच त्रास यंदाही शासन किंवा वीज कंपनी देत असल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.
रब्बी हंगाम अतिपावसाने लांबला आहे. अतिपावसात खरिपात नुकसान झाले. रब्बीतून नुकसान भरून काढू, असे नियोजन शेतकरी करीत असतानाच वीज तोडण्याचे आदेश आल्याने नियोजन कोलमडले आहे. कारण शेतकरी पेरणी करणे टाळत आहे. घरात गहू, हरभऱ्याचे बियाणे आहे. पण ते पेरू शकत नाही. कारण वीज कंपनीने सर्वच गावांत आठ ते १० दिवसांत बिले भरा, अन्यथा वीज तोडू, असे बजावले आहे. किमान एक बिल भरा, असे वीज कंपनीचे कर्मचारी सांगत आहेत. यामुळे बिलाचा निधी गोळा करण्याची धावपळ काही शेतकरी करीत आहेत.
कारण हाती पुरेसा पैसा नाही. कापूस घरात येत आहे. त्यासाठी मजुरी अव्वाच्या सव्वा द्यावी लागत आहे. काही शेतकरी कापूस विक्रीनंतर मजुरी देऊ, अशा आश्वासनावरही कापसाची वेचणी करून घेत आहेत. अशात वीज कंपनीने वसुलीचा धुमाकूळ सुरू केल्याने अडचणी वाढल्या आहेत. अशाने पेरणी आणखी लांबणीवर पडेल, अशीही स्थिती आहे. यामुळे रब्बी हंगामही लांबेल. तसेच उत्पादन कमी येईल. वीज तोडणी बंद करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.