
ST Protest : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसाठी १३ सप्टेंबर पासून राज्यभरात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर सोमवारी (ता. ११) रोजी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर एसटी कामगारांच्या महागाई भत्त्याचा दर ३८ टक्क्यांवरुन ४२ टक्के करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. महागाई भत्यामध्ये केलेल्या घसघशीत वाढीनंतर एसटी कामगारांनी आंदोलन मागे घेतले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कामगारांनी एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरात संप पुकारला होता. यावेळी राज्य सरकाराने कामगारांच्या अनेक मागण्या मान्य केल्या होत्या. परंतु, सरकारने मान्य केलेल्या कामगारांच्या मागण्यांची पूर्तता अद्यापही केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी १३ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता.
त्यानंतर सरकारच्यावतीने मंत्री उदय सामंत यांनी एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीला परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने, वित्तीय सल्लागार गिरीश देशमुख, कामगार महाव्यवस्थापक अजित गायकवाड, महाव्यवस्थापक नंदकुमार कोलारकर, विधी सल्लागार अजय नाथानी आणि संघटनेचे संदिप शिंदे व हनुमंत ताटे उपस्थित होते.
या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार एसटी कामगारांचा महागाई भत्ता आता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के देण्यात येणार आहे. तसेच एसटी कामगारांच्या थकबाकीसंदर्भात १५ दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले. बैठकीच्या शेवटी आंदोलन मागे करण्याबाबत आवाहन करण्यात आले. संघटनेच्या प्रतिनिधींनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.