Kharif Sowing : राज्यात ६० लाख हेक्टरवर पेरणी बाकी

Kharif Season 2023 : गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत आतापर्यंत राज्यात २१ लाख हेक्टरने कमी पेरा झालेला आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

Pune News : गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत आतापर्यंत राज्यात २१ लाख हेक्टरने कमी पेरा झालेला आहे. पाऊस लांबल्यामुळे शुक्रवार (ता. १४) अखेर राज्यात केवळ ८३ लाख हेक्टरवर पेरण्यापूर्ण झाल्या होत्या. अजून ६० लाख हेक्टरवर पेरा बाकी असल्यामुळे कृषी विभागातील जाणकार अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

राज्यात यंदा चार दिवस उशिरा मॉन्सूनचे आगमन झाले आहे. शिवाय मॉन्सून सर्वत्र पसरण्यास उशीर झाला. आतापर्यंत एकूण २५ टक्के कमी पाऊस झाल्याने केवळ ५८.६४ टक्के पेरण्या झालेल्या आहेत.

अजूनही ४२ टक्के पेरण्या रखडलेल्या आहेत. दरम्यान, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी जारी केलेल्या माहितीनुसार पंतप्रधान पीकविमा योजनेत आतापर्यंत ४७ लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. या शेतकऱ्यांनी त्यांचे ३०.२५ लाख हेक्टर पेराक्षेत्र विमा संरक्षित केले आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing Nanded : नांदेड जिल्ह्यात चार लाख ६१ हजार हेक्टरवर पेरणी

कृषी विभागाच्या अहवालानुसार, जून महिन्यात सरासरीच्या केवळ ५४ टक्के पाऊस झाला आहे. चालू महिन्यात देखील १४ जुलैपर्यंत ४४ टक्के कमी पाऊस झालेला आहे. या महिन्यात आतापर्यंत ३३० मिलिमीटरऐवजी केवळ २६४ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. पुणे, नाशिक, अमरावती व मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही.

आतापर्यंत ६३ तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांच्या आत, १४५ तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांच्या आत, तर ९७ तालुक्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस झालेला आहे. केवळ ५० तालुक्यांमध्येच १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. राज्यात खरिपाचा पेरा १४२ लाख हेक्टरवर होतो. त्यापैकी १०२ लाख हेक्टर गेल्या हंगामात याच कालावधीत पेरा झाला होता.

यंदा मात्र आतापर्यंत केवळ ८३ लाख हेक्टरवर पेरा करता आला आहे. ठाणे, गोंदिया, रायगड, सांगली आणि भंडारा या पाच जिल्ह्यांत सर्वांत कमी पेरण्या झालेल्या आहेत. मात्र राज्यात कपाशीची पेरणी ७९ टक्के, तर सोयाबीनची पेरणी ७६ टक्के झाली आहे. चालू आठवड्यात पाऊस चांगला झाल्यास उर्वरित पेरण्याही होतील, असा विश्‍वास कृषी विभागाला वाटतो आहे.

Kharif Sowing
kharif Sowing : पावसाच्या दडीनं दुबार पेरणीचं संकट?

राज्यात सोयाबीनचा पेरा ४१.२९ लाख हेक्टरवर होतो. यंदा आतापर्यंत ३१.७४ लाख हेक्टरवर पेरा झालेला आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत पेरा ३८ लाख हेक्टरच्या पुढे गेला होता. कपाशीचा सरासरी पेरा ४२ लाख हेक्टरवर होतो.

गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी याच कालावधीपर्यंत ३७ लाख हेक्टरवर पेरा पूर्ण केला होता. यंदा पावसाअभावी पेरा ३३.३० लाख हेक्टरवर रखडला आहे. १५ लाख हेक्टरवर खरीप भात घेणाऱ्या राज्याच्या प्रमुख भागांमध्ये आतापर्यंत केवळ १५ टक्के भात लागवड झालेली आहे. तुरीचा पेरा गेल्या वर्षी याच कालावधीत ९.११ लाख हेक्टरवर झाला होता. यंदा हाच पेरा ७ लाख हेक्टरवर रेंगाळला आहे.

...अशी आहे पीकविमा योजनेची स्थिती

खरीप २०२२ पीकविम्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ः ९६६२२६१

खरीप २०२३ पीकविम्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची आतापर्यंतची संख्या ः ४७४१८४३

यंदाची कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ः २८३५९

यंदाची बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ः ४७१३४८४

चालू हंगामातील विमा संरक्षित क्षेत्र ः ३०२५३००

चालू हंगामातील विमा संरक्षित रक्कम ः १५०७२.५८

एक रुपयाप्रमाणे आतापर्यंत जमा विमा हप्ता ः ४७४२८२९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com