
Solapur News : तब्बल दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. मंगळवारी (ता.१८) दिवसभर जिल्ह्यातील बहुतांश भागात भीजपाऊस झाला. त्यानंतर सलग दुसऱ्यादिवशी बुधवारीही (ता. १९) सकाळपासूनच पावसाने सुरुवात केली.
त्यामुळे सूर्यदर्शन होऊ शकले नाही. मुख्यतः जिल्ह्यातील पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट, करमाळा, माढ्यासह संपूर्ण जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने पेरणी झालेल्या पिकांना मोठा आधार झाला. तसेच शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
मागच्या महिन्यात एक-दोन वेळा झालेल्या हलक्या पावसावरच अनेक भागात पेरण्या उरकल्या होत्या. त्यापैकी अनेकांचा पेरा वाया गेला, तर ज्यांची पीके त्यातूनही तगली, त्यांना या पावसाने मात्र चांगलाच आधार दिला आहे.
जिल्ह्यात खरिपात तूर, सोयाबीन, मूग, मटकी, उडीद ही पीके घेतली जातात. त्यातही सोयाबीन आणि तुरीचे क्षेत्र सर्वाधिक असते. यंदा जुलैचा दुसरा पंधरवडा आला, तरी पाऊस पडत नव्हता.
त्यामुळे चिंता व्यक्त होत होती. गेल्या दोन दिवसांत मात्र वातावरणात चांगला बदल झाला. मंगळवारी (ता. १८) पहाटेपासूनच पावसाने सुरवात केली. सुरुवातीला काहीशी हलकी हजेरी लावली. पण त्यानंतर दिवसभर त्याची संततधार सुरु राहिली. रात्री उशिरापर्यंत ही संततधार थांबून-थांबून सुरुच राहिली.
आज पुन्हा बुधवारी (ता. १९) सकाळपासून अधून-मधून संततधार सुरु राहिल्याने सूर्यदर्शनही होऊ शकले नाही. त्यानंतरही दिवसभर कधी पाऊस, कधी ऊन असे वातावरण अनेक भागात राहिले. मुख्यतः जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, अक्कलकोट, माढा, करमाळा ते माळशिरस, सांगोला अशी सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.