
Biological Control : टोमॅटो, वांगी, आले आदी पिकांसाठी सूत्रकृमी घातक ठरत आहेत. या सूत्रकृमीच्या एकात्मिक कीड व्यवस्थापनासंबंधी ठोस उपाय देण्यासंबंधीचा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन गावांतील २० टोमॅटो व २० वांगी उत्पादक ४० शेतकऱ्यांच्या शेतावर राबविला जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी कृषी विज्ञान केंद्र आणि यासंबंधीचा प्रस्ताव ‘एनसीआयपीएम’कडे दिला होता. गरज ओळखून त्याला मंजुरी दिली आहे.
आयसीएआर, एनसीआयपीएमच्या समन्वयातून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील कृषी विज्ञान केंद्र- १ ने यासाठी पुढाकार घेतला आहे.
सूत्रकृमी हा डोळ्यांना न दिसणारा शत्रू आहे. त्यामुळे नियंत्रणास अवघड आहे. सूत्रकृमी झाडांच्या मुळांवर जखम करून रस शोषण करतात व त्या ठिकाणी इतर हानिकारक बुरशीची वाढ होऊन झाडाची वाढ खुंटते व झाडे मरतात. यामुळे शेतकऱ्यांनी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. यासाठीच हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी राबविण्यात येणार आहे. एनसीआयपीएमचे डॉ. सुभाष चंद्रा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रा मणी, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर यांचे विशेष मार्गदर्शनाखाली फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण व डोंगरगाव या दोन गावातील ४० शेतकऱ्यांच्या शेतावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामध्ये टोमॅटो व वांगी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्लॉटचा समावेश असेल. शेतकऱ्यांना संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
२०२३ ते २०२६ दरम्यान हा प्रकल्प राबविल्या जाणार आहे. माहितीनुसार, सूत्रकृमी नियंत्रणासाठी एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन ते सव्वादोन कोटी रुपये शेतकऱ्यांचे खर्च होतात. एवढा खर्च करूनही १५ ते ४० टक्क्यांपर्यंत उत्पादन व उत्पन्नात घटही होतेच. त्यामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या अतिरिक्त खर्चाला नियंत्रित करून त्याच्या उत्पादन व उत्पन्नात भर घालण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे. एनसीआयपीएमच्या दिशानिर्देशानुसार वेळोवेळी माती नमुने व निरीक्षणाची नोंद घेतली जाणार आहे.
सूत्रकृमीची नेमकी कोणती प्रजाती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मातीत आढळते. त्यावर नियंत्रणासाठी काही जैविक उपाय आहेत का, याचेही संशोधन प्रकल्पातून होणार आहे. एनसीआयपीएमचे शास्त्रज्ञ त्यांच्या नियोजनानुसार प्रत्यक्ष निरीक्षण प्लॉटला भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत. तीन वर्षांच्या संशोधन व निरीक्षणानंतर सूत्रकृमी नियंत्रणासाठी ठोस उपाय सुचविले जाणार असल्याची माहिती या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून काम पाहणारे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर झाडे यांनी सांगितले. अशा पद्धतीने संशोधन करणारा हा महाराष्ट्रातील अलीकडच्या काळातील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पातील संशोधनाचा नाशिक, नगर, लातूर, पुणे, जळगाव, जालना, छत्रपती
संभाजीनगर आदी महाराष्ट्रातील टोमॅटो, वांगी, आले आदी पीक घेणाऱ्या व सूत्रकृमीने कमी अधिक प्रमाणात त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.