
उमरगा : अतिवृष्टी (Heavy Rain) आणि अनियमित निसर्गाच्या चक्रव्युहात अडकलेल्या खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांच्या उत्पन्नात कमालीची घसरण झाल्याने सर्व शेतकऱ्यांची सर्व मदार रब्बी हंगामावर (Rabi Season) अवलंबून आहे.
सद्या विहिरींना मुबलक पाणी (Water) असल्यामुळे रब्बी हंगाम चांगला जाईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असताना अनियमित वीज पुरवठ्याचा खोडा पिकाच्या वाढीसाठी घातक ठरत आहे.
अति पावसामुळे हातून गेलेल्या खरीप हंगामाची भरपाई म्हणून रब्बीवर मदार असलेल्या शेतकऱ्यांवर साहेब...आमच्या पिकाला पाणी देण्यासाठी वीज तरी सुरळीत द्या म्हणण्याची वेळ आली आहे.
अधून- मधुन वीज गायब होत असल्यामुळे जोमदार अवस्थेत असलेली पिके सुकू लागली आहेत. ग्रामीण भागात कृषी पंपाला अनियमितपणे वीज पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगामही आता धोक्यात सापडला आहे.
महावितरण कंपनीने जास्तीच्या विद्युत दाबाने विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
उमरगा तालुक्यामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यांमध्ये सर्वत्र सततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची वाढ खुंटली होती.
तत्पूर्वी कोरडे असलेले जलप्रकल्पही या पावसाने तुडुंब भरले होते. ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने तर कहर केला होता.
या पावसामुळे खरीप पिके, फळबाग, भाजीपालावर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवल्याने शेतकरी हताश झाला होता.
तालुक्यात कोरडवाहूच्या तुलनेत बागायतदार क्षेत्र कमी आहे. तथापि खरिपात झालेल्या पीक नुकसानीची रब्बीमधून भरपाईसाठी शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे.
पंधरा रोहित्रे जळाली
तालुक्यातील पंधरा रोहित्रे जळाल्याने, त्यावर अवलंबून असलेल्या जवळपास शंभर शेतकऱ्यांच्या शेतातीत पिकांची अवस्था दयनीय होत आहे. मुबलक पाणी असूनही शेतकऱ्यांना पिकांना पुरेसे पाणी देणे अशक्य होत आहे. भारनियमनामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना रात्री जोखीम पत्करत पिकांना पाणी द्यावे लागत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.