
उस्मानाबाद ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) यांनी शेतकऱ्यांच्या हक्काचा दोन वर्षापूर्वीचा ऱखडलेला पीक विमा (Crop Insurance) द्यावा व ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालायासमोर आमरण उपोषण (Kailas Patil Hungar Strike) सुरु केले आहे. शुक्रवारी (ता.२८) त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. जोपर्यंत शेतकऱयांच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत आपण माघार घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. दुसरीकडे त्यांच्या आंदोलनाला शेतकऱयांतूनही मोठा पाठिंबा मिळतो आहे.
आमदार पाटील यांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. दररोज त्यांना मिळणारा पाठींबा देखील वाढत आहे. मात्र दुसऱ्या बाजुला त्यांची प्रकृती खालावत चालल्याचे वैद्यकीय अधिकारी यानी सांगितले आहे. त्यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहु नये, असा इशारा देखील दिला आहे. त्यामुळे सुरु असलेल्या उपोषणाला कोणत्याही क्षणी हिंसक वळण लागण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
जिल्ह्यात सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय सततच्या पावसाने उरल्या सुरल्या पिकांनाही विविध रोगाने ग्रासले आहे. या परिस्थितीत शेतकरी अडचणीत आला असून, दोन वर्षापूर्वी शेतकऱयांच्या हक्काचा पीकविमा आणि नुकसान भरपाई त्वरीत द्यावी. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २०२० मधील पिकविम्याची ५३१ कोटी रुपये जिल्हयातील तीन लाख ५७ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तीन आठवडयात जमा करण्याचे बंधन होते, असे असतानाही अदयापपर्यंत पीकविमा जमा झाला नाही.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धुडकावत फक्त न्यायालयात जमा केलेल्या २०० कोटीवर प्रशासन बोळवण करत असल्याचे दिसुन येत आहे, हा पीक विमा जमा होत नाही, तोपर्यंत माघार नाही, असा पवित्रा आमदार पाटील यांनी घेतला आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.
जिल्हाधिकारी ओंबासे यांनी सांगितलं की, खरीप 2020 मधील 541 कोटीची मागणी होती. पैकी कंपनीने तत्काळ 200 कोटी जमा केले आहेत. विमा कंपनीने 341 कोटी रक्कम दिलेली नाही. त्यामुळे कंपनी विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. खात्यात जमा झालेली रक्कम आठ ते दहा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहोत.
तसेच खरीप 2021 मधील 374 कोटी विमा कंपनीने जमा केले नाहीत. त्यामुळे कंपनीला कायदेशीर नोटीस देणार आहोत. आणि त्यानंतर न्यायालयात याचिक दाखल करण्याबाबत कार्यवाही करू. त्यामुळे आमदार कैलास पाटील आणि शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती करतो." यावर अॅग्रोवनने आमदार कैलास पाटील यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
प्रकृती खालावली, पण उपचारास नकार
शुक्रवारी (ता.२८) उपोषणाचा पाचवा दिवस असून, प्रकृती खालावत जात असल्याने त्यांना उपचाराची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले. कैलास पाटील यानी मात्र उपचार घेण्यास विरोध केला असुन, माझ्यावर बळाचा वापर करण्यापेक्षा सरकारने कंपनीकडुन पैसे वसुल करण्यासाठी बळ वापरावे, असे प्रतिआव्हान दिले आहे.
समर्थन वाढु लागले
कैलास पाटील यांना जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणात समर्थन मिळु लागले आहे, सत्ताधारी पक्ष सोडुन इतर विविध राजकीय पक्षानी त्यांना पाठींबा दिला आहे. शिवाय समर्थन दर्शविण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतःला गाडुन घेतले आहे. पाडोळी, सारोळा येथील शेतकऱयांनी जलसमाधी आंदोलन केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.