
ॲग्रोवन वृत्तसेवा
अमरावती : जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत संततधार पावसाने (Rain) २,१६,३०४ शेतकऱ्यांच्या १,७९,४९१ हेक्टरमधील शेती व फळ पिकांचे (Fruit Crop) मोठे नुकसान (Crop Damage) झाले. यासाठी वाढीव निकषाने २७७.५८ कोटी रुपयांचा निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास सादर केला आहे.
जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत ८४ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली होती. यामुळे बाधित पिकांसाठी ५४३ कोटी रुपयांचा मदतनिधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. या नुकसानी व्यतिरिक्त दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने शेती व फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी २० ऑगस्ट रोजी घेतलेल्या आढावा सभेत दिले होते.
त्यानुसार प्रशासनाकडून पंचनाम्याची कारवाई पूर्ण करण्यात आली. त्यानुसार तेरा तालुक्यांमध्ये जिरायती क्षेत्रात एक लाख ९२ हजार ६१६ शेतकऱ्यांच्या एक लाख ५१ हजार ३८६ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. याकरिता १३,६०० रुपये हेक्टरप्रमाणे तीन हेक्टर मर्यादित २०५.८८ कोटी रुपयांची मागणी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी शासनाकडे केली आहे. बागायती पिकांमध्ये ६१८ हेक्टरमध्ये केळी, १३१ हेक्टरमध्ये कांदा, १७५ हेक्टरमधील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.
इतर पिकांचे नुकसान ३३ टक्क्यांवर
सततच्या पावसाने ६०,७०५ हेक्टरमधील सोयाबीन ५०,५९८ हेक्टर कपाशी, २९,४५१ हेक्टर तूर, ७,५५१ हेक्टरमध्ये मूग, १,४५३ हेक्टरमध्ये उडीद, ३० हेक्टर मका, १,३७३ हेक्टर ज्वारी, ८२ हेक्टर मिरची, ६३ हेक्टर भुईमूग व ८० हेक्टरमधील इतर पिकांचे नुकसान ३३ टक्क्यांवर झाले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.