
मुक्ताईनगर, जि.जळगाव : जिल्ह्यासह हतनूर धरण (Hatnur Dam) लाभक्षेत्रात चांगला पाऊस (Rain) झाल्याने ‘हतनूर’चे दरवाजे उघडण्यात येऊन पाणी सोडण्यात येत आहे. हे जास्तीचे वाहून जाणारे पाणी आताच ओझरखेडा धरणात (Ozarkheda Dam) सोडण्यात यावे, अशी मागणी खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
वरणगाव - तळवेल उपसा सिंचन योजनेंतर्गत येणाऱ्या ओझरखेडा धरणाची पातळी ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात कमी होऊन शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते, या ओझरखेडा धरणाचे पाणी भुसावळ औष्णिक वीज केंद्रासाठी राखीव असल्याने या धरणाची पातळी कमी झाली असता, शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास अडचणी येत असून, त्यामुळे त्रासाला सामोरे जावे लागते. सध्या चांगला पाऊस पडत असून, हतनूर धरणातून पाणी वाहून जात आहे. जर हतनूर धरणातून वाहून जाणारे पाणी आताच ओझरखेडा धरणात सोडण्यात आले तर पुढील काळात धरणाची पातळी चांगली राहून धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळून अडचणी येणार नाहीत,असेही खासदार खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
हतनूर धरणातून ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याबाबत मागील वर्षी वेळोवेळी मागणी करून देखील पाणी सोडण्यात आले नव्हते. शेवटी सप्टेंबर महिन्यात फक्त २ दिवसांसाठी पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास झाला होता. तरी या वेळेस आत्ताच पाणी सोडण्यात यावे, असे खासदार रक्षा खडसे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.