
Jalgaon News : खरीप हंगामात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत. सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक भागात सुटेल.
खरिपातील कापसाला याचा मोठा फायदा होऊन अपेक्षित उत्पादन येण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. कोरडवाहू कापूस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. पण पाऊस सुरूच राहिल्यास पुढे पूर्वहंगामी (बागायती) कापूस उत्पादकांच्या कापसाचे नुकसान वाढेल, असेही चित्र आहे.
काळ्या कसदार जमिनीत पाणी तुंबू लागले आहे. या भागातील पूर्वहंगामी कापूस पिकाचे पाऊस सुरूच राहिल्यास नुकसान पुढे होईल. कारण पाण्याचा निचरा काळ्या कसदार जमिनीत होत नाही. पिकात फळे किंवा कैऱ्या पक्व झाल्या असून, त्या उमलण्याच्या अवस्थेत आहेत. पावसाने त्या काळवंडून बोंडे केळी पिवळी पडतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पावसाने जून व ऑगस्टमध्ये मोठी दडी मारली होती. ऑगस्टमध्येच ऑक्टोबर हिटचा अनुभव येत होता; तर पिकांना पाणी नसल्याने पिके सुकू लागली होती. मात्र, सप्टेंबरमध्ये अपवाद वगळता अनेक भागात चांगला पाऊस झाला आहे. दोन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने जळगाव जिल्ह्यात तापी, गिरणा, वाघूर नदीला प्रवाही पाणी आले आहे.
धुळ्यात अनेर, पांझरा, नंदुरबारात उदय नदीतही पाणी आहे. ऑगस्टमध्ये पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांची बिकट स्थिती होऊन, उत्पादनात ५० टक्के घटीची शक्यता होती. आताच्या पावसाने कोरडवाहू कापूस उत्पादनातील तूट काही अंशी भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
ऑक्टोबरमध्ये हवे कोरडे वातावरण
पुढे ऑक्टोबरमध्ये कडक ऊन पडणे आवश्यक आहे. कारण यामुळे पूर्वहंगामी कापसाची बोंडे व्यवस्थित उमलतील, कापूस वेचणी व्यवस्थित होऊन दर्जेदार कापूस हाती येईल. यामुळे दरही बऱ्यापैकी मिळेल. पण पाऊस आल्यास पहिल्या वेचणीसा कापूस पाण्यात जाईल किंवा नुकसान होईल, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.