Khandesh Rain : खानदेशात अनेक भागांत पाऊस

Rain Update Khandesh : खानदेशात बुधवारी (ता. ५) सकाळी व रात्री अनेक भागात जोरदार व मध्यम पाऊस झाला. काही भागात तुरळक पाऊस आहे.
Rain
Rain Agrowon
Published on
Updated on

Jalgaon Rain News : खानदेशात बुधवारी (ता. ५) सकाळी व रात्री अनेक भागात जोरदार व मध्यम पाऊस झाला. काही भागात तुरळक पाऊस आहे. परंतु यामुळे पेरणी झालेल्या क्षेत्रातील कोवळे कोंबांना दिलासा मिळाला आहे. तसेच पुढील पेरणीलाही गती मिळणार आहे.

खानदेशात २० टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. अनेकांनी धूळपेरणी केली. तर काहींनी अल्प पावसानंतरही पेरणीची वेळ निघून जाईल, यासाठी पेरणी केली. पण रविवारपासून (ता. २) उष्णता वाढली. ऊन सावलीचा खेळ सुरू होता. पेरणीनंतर उमललेले कोवळे कोंब अनेक भागात नष्ट होण्याची भीती होती.

कारण उष्णतेमुळे वाफसा स्थिती नाहीशी झाली. अशातच बुधवारी पहाटे साडेतीन ते सहा या दरम्यान खानदेशात अनेक भागात पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात यावल, जामनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, साक्री भागात जोरदार पाऊस झाला. तसेच रात्रीही जोरदार सरी कोसळल्या.

Rain
Kinwat Rain Update : किनवट, माहूर तालुक्यांत पावसाचा जोर; दोन मंडलांत अतिवृष्टी

बुधवारी रात्री जळगाव जिल्ह्यातील जळगाव, धरणगाव, पारोळा, एरंडोल भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. तसेच जामनेर, यावल, भुसावळमधील काही गावांत अर्धा ते एक तास जोरदार पाऊस झाला.

धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, साक्री भागातही मध्यम व हलका पाऊस झाला. गुरुवारी (ता.६) पहाटेदेखील तुरळक पाऊस काही भागात सुरू होता. पण कुठेही अतिवृष्टी बुधवारच्या पावसात झालेली नाही.

पावसाचे आगमन झाल्याने रखडलेल्या पेरण्यांना गती येणार आहे. कारण उष्णतेमुळे अनेकांनी पेरणी करणे टाळले. १२ जुलैपर्यंत सोयाबीन, कापूस लागवड करणे योग्य ठरणार आहे. यामुळे शेतकरी सोयाबीन व कापसाची लागवड करतील, असे चित्र आहे.

Rain
Maharashtra Rain Update : राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी

कापूस लागवडीला फटका शक्य

कोरडवाहू कापसाखालील क्षेत्र खानदेशात सुमारे पावणेसात लाख हेक्टर अपेक्षित होते. तर पूर्वहंगामी कापसाची सुमारे पावणेदोन लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. ही लागवड यंदा स्थिर आहे. परंतु पाऊस लांबल्याने कोरडवाहू कापसाची लागवड कमी होईल, असे दिसत आहे.

कारण जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात कापूस लागवड केल्यास पुढे गुलाबी बोंड अळीमुळे पिकहानी वाढते. कमी उत्पादन येते, असाही अनुभव अनेक शेतकऱ्यांना आहे. कोरडवाहू क्षेत्रातील कापूस लागवड २० जूनपूर्वीच व्हायला हवी होती, पण पावसाअभावी लागवड रखडली. पुढे लागवडीला फटका बसेल, असाही अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत.

केळीलाही आधार

खानदेशात केळी लागवड सुरूच आहे. पण त्यासाठी सिंचन करावे लागत होते. कारण पाऊस नव्हता. पण पावसाच्या आगमनाने मोठ्या व लहान किंवा अलीकडेच लागवड केलेल्या केळीमध्ये सिंचन करण्याची गरज नसणार आहे. तसेच पावसामुळे निसवलेल्या बागांमध्ये घड तयार होण्याची गती वाढेल. लहान बागांची वाढही जोमात होईल, असा मुद्दाही शेतकरी उपस्थित करीत आहेत.

२४ तासातील पाऊस (मिलीमीटरमध्ये)

जळगाव ः धरणगाव १३, जळगाव १४, जामनेर १८, यावल २०. नंदुरबार ः शहादा १६, तळोदा १५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com