
मंचर, जि. पुणे : आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर(Bhimashankar) येथे अभयारण्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा आणि बैठकीतील निर्णय लेखी स्वरूपात ग्रामसभांना दिले जातील, असे वनविभागाकडून (Forest Department) सांगण्यात आले होते; परंतु या बैठकीतील चर्चा आणि निर्णय लेखी स्वरूपात अद्याप मिळाले नाहीत.
झालेल्या बैठकीतील वास्तव चर्चेवर आधारित असे लेखी पत्र न मिळाल्यास मंचर येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर किसान सभेतर्फे धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किसान सभेच्या जिल्हा समितीने दिला आहे.
समितीतर्फे आंदोलनाच्या इशाऱ्याबाबतचे पत्र उपवनसरंक्षक अमोल थोरात यांना देण्यात आले आहे. भीमाशंकर अभयारण्यातील धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास निर्मितीबाबत शासनाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे सदस्य व परिसरातील ग्रामस्थ, विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक मागील महिन्यात भीमाशंकर येथे झाली.
त्यातील चर्चा आणि निर्णय लेखी स्वरूपात ग्रामसभांना दिले जातील, असे वनविभागाकडून सांगण्यात आले होते; परंतु ते दिले नाहीत. हे निर्णय लेखी स्वरूपात त्वरित मिळावेत, यासाठी हे निवेदन दिले आहे.
बैठकीला उपस्थित सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी जे मुद्दे नमूद केले होते, ते सर्व मुद्दे सविस्तरपणे या पत्रात असावेत, अशी मागणी करण्यात आली. किसान सभेचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे, सचिव विश्वनाथ निगळे, उपाध्यक्ष अॅड. नाथा शिंगाडे, राजू घोडे, सहसचिव अशोक पेकारी, खजिनदार विकास भाईक आदींनी निवेदन दिले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.