
Amravati News : गेल्या महिनाभरापासून पावसाने खो दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. याच कारणामुळे पेरण्यांनादेखील खीळ बसली असताना आता अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत जुलै महिन्यापर्यंत १०६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. परिणामी येत्या आठवड्यात पेरणीची टक्केवारी देखील वाढेल, असा विश्वास कृषी विभागाने वर्तविला आहे.
जून ते जुलै या कालावधीत बुलडाणा जिल्ह्यात सरासरी १८२.७ मिमी पाऊस पडतो आतापर्यंत ९५.२ म्हणजे ५२.१ टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे. अकोला जिल्ह्याची सरासरी १८७.३ असून आतापर्यंत ५९ मिमी (३१.५ टक्के), वाशीम २२१.४ पैकी १२५.१ (५६.५ टक्के),
अमरावती २०८.३ या सरासरीच्या तुलनेत ९७ मिमी (४६.६ टक्के), तर यवतमाळ जिल्ह्यात सरासरीच्या २२१.९ च्या तुलनेत १३६.५ मिमी (६१.५ टक्के) याप्रमाणे अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत सरासरी सुमारे १०६.५ मिमी पावसाची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे.
पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे आतापर्यंत खोळंबलेल्या पेरणीच्या कामांना गती येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाच जिल्ह्यांत पेरणीखाली सरासरी ३१ लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत त्यातील सुमारे ११ लाख ५३ हजार हेक्टरवर पेरणी आटोपली आहे.
याची टक्केवारी ३६.४ असून पावसामुळे येत्या आठवड्यात यात मोठी वाढ होईल, असा आशावाद कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
पावसामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. आता विभागाची पावसाची सरासरी १०६ मिमीपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात पेरण्यांना वेग येणार आहे. त्यामुळे पेरणी ६५ टक्क्यांच्या पुढे जाईल, अशी शक्यता आहे.
- किसन मुळे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.