Team Agrowon
या खरीप हंगामात असमतोल पावसाचा अकोला जिल्ह्याला मोठा फटका बसण्याची चिन्हे तयार होत आहेत.
जुलैचा पहिला आठवडा पूर्ण झाला तरीही जिल्हयात पुरेसा पाऊस झालेला नाही. परिणामी यंदा जिल्ह्यात केवळ ११ टक्के क्षेत्रावर पेरणी होऊ शकलेली आहे.
जिल्ह्याच्या चार लाख ४३ हजार हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी केवळ ५२ हजार ७२५ हेक्टरवर पेरणी होऊ शकलेली आहे.
यातही प्रामुख्याने सोयाबीनची २४ हजार ३७१ हेक्टर व कपाशीची २४ हजार २०९ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे.
जिल्ह्यात पावसाअभावी पेरणीला वेग आलेला नाही. पावसाचा सुमारे एक महिना बहुतांश कोरडा गेला. आजवर हलक्या स्वरूपाचाच पाऊस अधिक प्रमाणात झालेला आहे.
वाशीम जिल्ह्यात अकोला, बुलडाणा जिल्ह्यांच्या तुलनेत पेरण्या अग्रेसर आहेत. या जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या ५० टक्क्यांवर भागावर पेरणी पूर्ण झाली आहे. हा जिल्हा सोयाबीनचे हब म्हणून ओळखल्या जातो.