
Nagar News : पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले तरीही राज्यातील बहुतांश भागात पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भविष्यातील परिस्थिती पाहून चाराटंचाई निर्माण होऊ नये यासाठी चारा डेपो सुरू करण्याबाबत तसेच फळबागा जगवण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशी मागणी आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
पद्मश्री पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना निवेदन दिले आहे. ‘राज्याचा काही भाग वगळता इतर ठिकाणी पुरेसा पाऊस पडलेला नाही. परतीचा मॉन्सून किती पडेल आणि तो पुरेसा पडेल याची शाश्वती नाही. खरिपातील बहुतांश पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे चाऱ्याचे फारसे उत्पादन होईल, असे वाटत नाही.
त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पशुधन वाचण्याची मोठी चिंता निर्माण होणार आहे. लम्पी स्कीन आजारामुळे चारा छावणी सुरू करणे शक्य नाही. त्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्याच्या दृष्टीने तातडीने चाराडेपोचे नियोजन करणे गरजेचे आहे.
ज्या भागात धरणाचे पाणी आहे त्याठिकाणी तसेच कृषी विद्यापीठ व कृषी महामंडळे यांच्या क्षेत्रावर चारापिकाचे नियोजन करण्याची गरज आहे, असे पोपटराव पवार यांनी म्हटले आहे.
मागील तीन वर्षांत सरासरी किंवा जास्तीचा पाऊस पडल्यामुळे फळबागा मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. यंदा मात्र पाऊस नसल्यामुळे राज्यातील बहुतांश भागात फळबागाही संकटात आहेत.
जर शेतकऱ्यांच्या फळबागा वाचल्या नाहीत तर मागील तीन वर्षांची मेहनत वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील फळबागा जागविण्याच्या दृष्टीने राज्यस्तरांवरून योग्य ते नियोजन करावे आणि आगामी काळातील दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी पोपटराव पवार यांनी केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.