
Nashik News अल-निनोमुळे (el Nino) निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईच्या (Water Shortage)अनुषंगाने नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. तसेच त्याबाबत गावपातळीवरदेखील सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात पाणीटंचाईबाबत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री भुसे बोलत होते.
या बैठकीस नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपवनसंरक्षक पंकज गर्ग,
मालेगाव अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते,
निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा प्रशासन अधिकारी शाम गोसावी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
भुसे म्हणाले, की पाणीटंचाईचे नियोजन करताना ग्रामपंचायत सदस्यांपासून ते खासदार या सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या माध्यमातून नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन करण्यात यावे.
त्याचप्रमाणे ज्या भागातील पाणीपुरवठा योजनांची कामे ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली आहेत, ती कामे तातडीने पूर्ण करावीत.
जेणे करून पाणीटंचाई काळात त्या पाणीपुरवठा योजनांचा नागरिकांना उपयोग होईल. त्यासाठी प्रांताधिकारी यांनी संबंधित विभागांच्या स्थानिक पातळीवर बैठका घेऊन आवश्यकेनुसार नियोजन करण्यात यावे.
पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यासोबतच वनक्षेत्रातील प्राण्यांना गरजेनुसार पाणी उपलब्ध होईल याकडेही लक्ष देण्यात यावे.
त्याचप्रमाणे टंचाई काळात गावपातळीवर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लोकांच्या हाताला काम मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. यासाठी अधिकारी यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जावून पाहणी करावी.
तसेच नादुरुस्त बोरवेलची कामे मिशन मोडवर घेऊन तातडीने दुरुस्त करण्यात यावीत. पाण्याचा अपव्यव होणार नाही यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केल्यास त्याचा लाभ येणाऱ्या काळात होणार आहे.
कृषी विभागाने आराखडा तयार करावा
पुरावठा विभागाने अन्नधान्याचे व पशुसंवर्धन विभागाने जनावरांना चारा उपलब्ध होण्यासाठी नियोजन करावे. शिक्षण विभागाने येणाऱ्या काळातील उष्णतेची परिस्थिती लक्षात घेऊन शाळांचा कालावधी व त्यांच्या वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे.
तसेच संभाव्य टंचाई काळात कमी पाऊस झाल्यास किंवा उशिराने पाऊस आल्यास त्या काळात कोणती पिके घेणे फायदेशीर ठरेल त्याअनुषंगाने कृषी विभागाने आराखडा तयार करावा.
संभाव्य निर्माण होणाऱ्या टंचाईकडे सकारात्मकपणे पाहून टीमवर्कने विकासात्मक कामे करण्यावर भर देण्यात यावा, असेही भुसे यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.