
Latur News : शिवली (ता. औसा) येथे शनिवारी (ता. तीन) दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तासभर झालेल्या या वादळी पावसामुळे येथील पपई बागांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले.
जवळपास ६० एकरवरील या बागांचे कोटीवर नुकसान झाल्याचे येथील पपई बागधारक शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान सदरील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
येथील जवळपास ३० ते ३५ शेतकऱ्यांनी ६० एकरावर नोव्हेंबर महिन्यात पपईची लागवड केली होती.
सदरील पिके फळधारणेच्या अवस्थेत होती. पुढील दोन महिन्यात पपईची तोड करून बाजारपेठेत विक्री करण्याचे शेतकऱ्यांनी नियोजन केले होते. मात्र शनिवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याचा मोठा आर्थिक फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे.
नुकसान झालेल्या पपई बागधारक शेतकऱ्यांमध्ये सतीश पाटील, गुरुलिंग कुरले, बंडू पाटील, संगमेश्वर पावले, शांतेश्र्वर पावले, सुरेश मेंढेकर, कृष्णा मेंढेकर, संतोष मेंढेकर, मधू घोडके, हनुमंत कांबळे, दिनू मोहिते, पंडित मोहिते, शिवाजी आळणे, औदुंबर पांचाळ, लिंगाप्पा कुरले, जीवन आळणे, व्यंकट बनसोडे, दत्ता शिंदे सुरेश कुरे, मल्लिनाथ वाले, राजाराम शिंदे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा समावेश आहे.
याचबरोबर विजेच्या तारा आणि खांबाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून यामुळे वीज पुरवठा करण्यासाठी अडचणी येत आहेत. दरम्यान शासनाने सदरील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.