
Ratnagiri News : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून अधूनमधून सरी पडत आहेत. रत्नागिरीत सोमवारी (ता. २४) दुपारी कडकडीत ऊन पडले होते. राजापूरमधील पूर ओसरला असून जनजीवन पुर्वपदावर आले आहे.
भात लागवडीला वेग आला असून आतापर्यंत जिल्ह्यात ४२ हजार हेक्टरवर भात लावण्या पूर्ण झाल्या आहेत. आठवडाभरात दहा हजार हेक्टरवर लागवड झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
सोमवारी (ता. २४) सकाळी ८.३० पर्यंतच्या चोवीस तासांत गुहागर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक ७८ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी ६३.४४ मिमी पाऊस झाला. मंडणगडमध्ये ७१ मिमी, दापोली ६८, खेड ३७, गुहागर ७८, चिपळूण ७८, संगमेश्वर ७८, रत्नागिरी ३१, लांजा ६०, राजापूरमध्ये ७० मिमी पावसाची नोंद झाली.
पावसाचा जोर ओसरल्यामुळे राजापूर तालुक्यातील कोदवली नदीची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पूर ओरसला असून बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत झाले आहेत. खेडच्या जगबुडी नदीतील पाणी पातळी स्थिर झाल्याने पुराची भीती कमी झाली आहे. किनारी भागातील भातशेतीतील पाणी ओसरले आहे. त्यामुळे नुकसानीचे संकट टळले आहे.
पाऊस कमी झाल्यामुळे भात रोपे लावण्यांना वेग आला आहे. आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यात ५० टक्के लागवड पूर्ण झाली होती. सोमवारी (ता. २४) जिल्ह्यात ६० टक्क्यांहून अधिक लागवड झाली. जिल्ह्याचे एकूण क्षेत्र ६८ हजार हेक्टर आहे. त्यातील सुमारे ४२ हजार हेक्टरवरील लावण्या पूर्ण झाल्या आहेत. उशिरा पेरण्या केलेली रोप लावणीसाठी आता तयार झाली आहेत. अति पावसामुळे खेड, दापोली, मंडणगडसह राजापूरमधील शेतीची कामे थांबली होती. ती पुन्हा सुरू झाली आहेत.
खेड तालुक्यात एक व राजापुरात एक आणि संगमेश्वरमध्ये एक असे तीन मध्यम पाटबंधारे प्रकल्प असून तिन्हींमधील एकूण उपयुक्त साठा क्षमता १८२.६९ दशलक्ष घनमीटर आहे. मध्यम पाटबंधारे प्रकल्पांत नातुवाडी १८.३७७, गडनदी ६६.३८७, अर्जुना प्रकल्पात ७२.५६० साठा आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.