
Pune News : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असल्याने भात खाचरे भरून वाहत आहेत. त्यामुळे भात पिकांना दिलासा मिळाला असून पिके तरारली आहेत. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.
जिल्ह्यात मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर, आंबेगाव हे भात पिकांचे तालुके म्हणून ओळखले जातात. यंदा अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक, तर काहींनी चारसूत्री पद्धतीने लागवडी केल्या आहेत. आत्तापर्यंत पावसाचे तीन महिने पूर्ण झाले आहेत. पश्चिम पट्ट्यात चांगला पाऊस झाला.
सुरवातीच्या काळात पावसाचे प्रमाण कमी होते. परंतु जूनच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे रोपवाटिका टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे भात लागवडी वेळेवर झाल्या.
जिल्ह्यात सरासरीच्या ५९ हजार ६२७ हेक्टरपैकी ५९ हजार ६७९ हेक्टर म्हणजेच १०० टक्के लागवडी झाल्या आहेत. त्यानंतर पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली. त्यामुळे भात पिकांना पावसाची प्रतीक्षा होती.
लोणावळ्याच्या घाटमाथ्यावर ६२ मिलिमीटर
चालू महिन्यात दोन सप्टेंबरच्या दरम्यान बऱ्यापैकी पाऊस पडला. त्यामुळे भात पिकांना नवसंजीवनी मिळाली. त्यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मागील तीन दिवसांपासून पुन्हा पावसास पोषक वातावरण तयार झाले आहे.
त्यामुळे अनेक ठिकाणी कमी अधिक पाऊस पडला. रविवारी (ता.१०) सकाळी आठ वाजेपर्यंत लोणावळा घाटमाथ्यावर ६२ मिलिमीटर, वळवण ४८, शिरोटा २४, तर कुंडलीत १६ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे भात खाचरे पुन्हा पावसाच्या पाण्याने भरून वाहत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.