
माळेगाव, जि. पुणे ः फलटण, सातारा भागांतील लोकप्रतिनिधींनी नीरा देवघर धरणांतर्गत कालव्यांची रखडलेली (Canal Work) कामे होण्यासाठी सरकारकडे निधी उपलब्धतेसाठी जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे बारामती, इंदापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी सावध होऊन नीरा डावा कालव्याचा अस्तरीकरणाचा (Nira Left Canal Lining) मुद्दा सामोपचाराने मिटवावा. शासन स्तरावरील १२२ कोटी रुपयांचा निधी अस्तरीकरणासाठी (Lining) वापरात आणून शेतकऱ्यांनी कायमचे शाश्वत पाणी मिळवावे, अन्यथा बारामती, इंदापूरमधील शेतकऱ्यांच्या वादात पाण्याबरोबर अस्तरीकरणाचा निधीसुद्धा पळविला जाऊ शकतो, असा सावधगिरीचा इशारा सांगवी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किरण तावरे, बारामती बॅंकेचे संचालक रणजित धुमाळ, बारामती दूध संघाचे संचालक संजय देवकाते यांनी शेतकऱ्यांना दिला.
खांडज (ता. बारामती) येथे नीरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाच्या प्रश्नाबाबत शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्या वेळी किरण तावरे आदी पदाधिकारी शेकडो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
नीरा देवघर धरणांतर्गत तेथील कालव्यांची कामे निधी अभावी रखडलेली आहेत. त्यामुळेच नीरा देवघर, गुंजवणी धरणातील अतिरिक्त पाणी विशेषतः बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या मिळत आहे. त्यामुळेच उसारसाखी नगदी पिके घेणे शक्य होत आहे. नीरा देवघर अंतर्गत कालवा, वितरिकांची कामे पूर्णत्वाला येण्यासाठी तेथील लोकप्रतिनिधींनी सुधारित प्रकल्प मान्यता प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्य सरकारकडे निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या महत्त्वपूर्ण घडामोडींकडे बारामतीचे श्री. तावरे, श्री. धुमाळ, श्री. देवकाते, नितीन आटोळे यांनी शेतकऱ्यांचे लक्ष वेधले.
तावरे म्हणाले, ‘‘नीरा देवघर धरणांतर्गत कालव्यांची कामे पूर्ण झाल्यास फलटण, भोर, पारगाव खंडाळा, फलटण, माळशिरस आदी भागातील शेतकऱ्यांचा मंजूर पाणी मिळण्यासाठी आग्रह राहणार आहे. या प्राप्त स्थितीचा विचार करून बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नीरा डावा कालव्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या पाण्याचा काटकसरीने उपयोग करून घेतला पाहिले. सव्वाशे वर्षांपूर्वीच्या कालव्याची दयनीय अवस्था विचारात घेता त्याचे मजबुतीकरण, अस्तरीकरण आणि ठिकठिकाणच्या ब्रिटिशकालीन पुलांची देखभाल दुरुस्ती करणे क्रमप्राप्त ठरले आहे. ही कामे झाल्यानंतर कालव्याची वहनक्षमता (१२५० क्युसेकने) लक्षणीय वाढणार असून, शेतकऱ्यांना ३० दिवसांच्या आत पाण्याची उपलब्धता होणार आहे. सहाजिकच कालव्याचा खालच्या आणि वरच्या लाभधारक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. त्या उद्देशानेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे नीरा डावा कालव्याचे अस्तरीकरणासाठी १२२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.’’
बारामती हद्दीत देशमुख वस्ती, मोरेवस्ती, जळोची, बांदलवाडी आदी भागांत नीरा डावा कालव्याचे अस्तरीकरण झाले आहे. या भागातील सर्व शेतकऱ्यांना जलसंपदा खात्याने कालव्यावर विद्युत मोटारी टाकून पाणी नेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे बारामती, इंदापूर तालुक्यात टप्पापद्धतीने नव्याने होणाऱ्या अस्तरीकरणात कोणत्याच शेतकऱ्याची शेती पाण्याविना वंचित राहणार नाही, अशी हमी जलसंपदा खाते देत आहे. त्यामुळे अस्तरीकरणाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्वांना कालव्याचे मजबुतीकरण झाल्यानंतर कायमचे शाश्वत पाणी मिळणार आहे, अशी माहिती जलसंपदा खात्याचे अधिकारी आश्विन पवार यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.