
Maharashtra Rain Forecast : राज्यात ठिकठिकाणी आज हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत. पण राज्यात सर्वदूर असा पाऊस नाही. हवामान विभागाने उद्या आणि परवा असे दोन दिवस राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. हवामान विभागाने उद्या राज्यातील १० जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला.
हवामान विभागाने आज अमरावती जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला होता. तर विदर्भातील वर्धा आणि नागपूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना तसेच नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता.
तसेच विदर्भ आणि खानदेशातील इतर जिल्हे, मराठवड्यातील बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला होता. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक आणि नगर तसेच कोकणातील रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.
उद्याही राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. उद्या विदर्भातील अकोला आणि वाशीम, खानेदशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.
तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि पुणे, कोकणातील रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तसेच इतर जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने जारी केला.
रविवारी मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तर खानदेशातील नंदूरबार तसेच कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील इतर भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. पण राज्याच्या इतर भागात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.