
यवतमाळ : विमा हप्ता जमा (Insurance Premium) करूनही भरपाई (Compensation) मिळत नसल्यामुळे शेतकरी पंतप्रधान पीकविमा योजनेपासून (Crop Insurance Scheme) दुरावले होते. यंदा जिल्ह्यात चार लाख पंधरा हजार शेतकऱ्यांनी योजनेसाठी नोंदणी केली आहे. मात्र त्यापैकी केवळ दीड लाख शेतकऱ्यांनी नुकसान पूर्व सूचनांचे अर्ज (Intimation Application Of Crop Insurance) सादर केले आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही संभ्रमात न राहता नुकसान भरपाईचे अर्ज वेळेत सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
पीक विमा हप्ता भरल्यानंतर ही शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही असा काही वर्षातील अनुभव आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षात विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. यंदा जिल्ह्यात चार लाख पंधरा हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. शेतकऱ्यांना बीड पॅटर्ननुसार भरपाई मिळेल असा दावा केला जात आहे. मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांना मात्र कंपनीवर विश्वास नसल्याने त्यांचा योजनेला कमी प्रतिसाद मिळाला आहे. विमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांची संख्या कमी असतानाच जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी भरपाई मिळावी याकरिता पूर्व सूचना देणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या त्यापेक्षाही कमी आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातून केवळ दीड लाख शेतकऱ्यांनी नुकसान पूर्वसूचना कंपनीला दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तत्काळ प्रधानमंत्री पीक विमा योजनेची आढावा बैठक घेतली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, पीक विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक रामेश्वर धोटे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत नुकसान पूर्व सूचनांचे अर्ज आले नाही म्हणून विमा दावे नाकारण्याचे प्रकरण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी निर्देश जिल्हाधिकारी येडगे यांनी दिले.
कृषी अधिकाऱ्यांनी पुढील दोन ते तीन दिवसात नुकसानीचे व्यवस्थित पंचनामे करून अहवाल सादर करावा. पंचनामे करताना जिल्ह्यात ७० ते १०० टक्के पर्यंत झालेल्या नुकसानीनुसार संबंधितांच्या नुकसानीच्या टक्केवारीचा स्पष्ट उल्लेख करावा. जेणेकरून विमा दाव्याची रक्कम मिळण्यास अडचण येणार नाही असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी एकापेक्षा जास्त वेळा आपत्ती आल्याने शेतकऱ्यांचे पुन्हा पुन्हा नुकसान झाले आहे, असे असल्यास प्रत्येक वेळेच्या आपत्तीसाठी नुकसान भरपाईचे अर्ज देता येतील. ज्या पंचनाम्यात जास्त नुकसानीची नोंद आहे. त्या प्रमाणात जास्त भरपाई मिळण्यासाठी अर्ज ग्राह्य धरण्यात येईल अशी माहिती विमा कंपनीतर्फे बैठकीत देण्यात आली. येडगे म्हणाले, की भरपाईचे अर्ज उशिरा केल्यास जास्त रक्कम मिळेल असा गैरसमज काही शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र अर्ज आता किंवा नंतर सादर केला तरी पंचनाम्यात नमूद टक्केवारीनुसारच भरपाई मिळणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.