
Amravati News : मॉन्सूनचे अवघे २० दिवस शिल्लक उरले असतानाच अद्याप वीस मंडलांत सरासरीच्या केवळ ४० ते ५० टक्के इतक्याच पावसाची नोंद झाली आहे. पावसाने खंड दिल्यामुळे जमिनीत ओलावा कमी झाल्याने पिकांची वाढ खुंटली असून, सोयाबीनच्या उत्पादकतेवरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पावसाने जून महिन्यात उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. त्यानंतर जुलैत पावसाने हजेरी लावली. परिणामी, पेरण्यांना विलंब झाला. त्याचा परिणाम उत्पादकतेवर होणार होता. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत ७६४ मिलिमीटर पावसाची सरासरी अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात ४८१.५ मिमी इतक्याच पावसाची नोंद झाली आहे.
याची टक्केवारी अवघी ६३ इतकी आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत जिल्ह्यात ४७ टक्के पावसाची तूट असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. या आठवड्यात तीन दिवसांच्या कालावधीत रिमझिम पाऊस बरसला. त्याचा पिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. प्रत्यक्षात जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत असल्याने पिकाची स्थिती बिकट असल्याचे सांगण्यात आले.
आता पावसाचे केवळ तीन आठवडे उरले आहेत. परिणामी, पावसाची तूट भरून निघणे कठीण आहे. सोयाबीन बहरावर व शेंगा पक्व होण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे सोयाबीनला पावसाची आवश्यकता आहे. २० महसूल मंडलांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे. या मंडलांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा उत्पन्न कमी येणार आहे. विमा भरपाईसाठी या मंडलाकरिता अधिसूचना काढावी, अशी मागणी आहे.
कमी पर्जन्यमान असलेले मंडळ (टक्के)
धारणी ४७, धूळघाट ४२, सावलीखेडा ४८, वलगाव ४७, डवरगाव ४५, भातकुली ४९, आसरा ४१.७, खोलापूर ४७.९, लोणी ४५, दर्यापूर ३४, दारापूर ४४, सामदा ४६.९, थिलोरी ४७.१, अंजनगाव ४९, विहिगाव ५०, कापूसतळणी ५०, सातेगाव ५०, रासेगाव ४५, परसापूर ४०, पथ्रोट ४७ याप्रमाणे पावसाची नोंद आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.