Satara News : जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने पेरणीची कामे ठप्प आहेत. बुधवार (ता. ५) अखेर १३.८३ टक्के पेरणीची कामे झाली आहेत. जुलैचा आठवडा संपत आला तरी पाऊस येत नसल्यामुळे झालेल्या पेरण्या अडचणीत आल्या आहेत. पाऊस नसल्याने बी-बियाणे, खते खरेदीही शेतकऱ्यांकडून बंद झाली आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्रे ओस पडली आहेत.
खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने सुरवातीपासूनच तयारी केली होती. मात्र पावसाचे आगमन लांबले. जिल्ह्यात बहुतांशी भागात पुरेशा पावसाअभावी मशागतीची कामेही झालेली नाहीत. शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना गती दिलेली नाही. जिल्ह्यात ऊस वगळून दोन लाख ८८ हजार ४९४ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे.
यापैकी ३९ हजार ८९४ हेक्टर म्हणजेच १३.८३ टक्के पेरणीची कामे झाली आहेत. यामध्ये सर्वाधिक सोयाबीन पिकांची १२ हजार ९०९ हेक्टर म्हणजेच १७ टक्के पेरणी झाली आहे. भाताचे ४३ हजार ९७८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यापैकी सात हजार ५४६ हेक्टरवर पेरणी झाली.
खरीप ज्वारीचे ११ हजार १५३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्यापैकी ३ हजार ८१२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाटण तालुक्यात पेरणीची कामे उरकली आहेत. उर्वरित १० तालुक्यांत दहा टक्केही पेरणी झालेली नाही.
भात लागवडीचे वेळापत्रक कोलमडले
जुलै महिना सुरू झाला असला तरी पेरणीला अपेक्षित गेली आलेली नाही. भात लागवडीसाठी रोपे तयार करावी लागतात. मात्र पाऊस नसल्यामुळे रोपे तयार करण्याची प्रकिया सुरू झालेली नाही. यामुळे भात वेळेत लागवड होणार नाही. अपेक्षित पाऊस न झाल्यास भात लागण पुढे जाणार असून क्षेत्रातही घट होण्याची शक्यता आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.