
Yavatmal News : गेल्यावर्षी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना २९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यासाठी चार कोटी ९२ लाख २४ हजार ३९१ रुपये खर्च झाला. शिल्लक निधीतून काही योजनांचा निधी वितरित करण्यात आला होता. विहिरींचे अधिग्रहण व खासगी टँकरच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. शासनस्तरावरून निधी वितरणास विलंब झाला.
टँकरचालकांसह अधिग्रहणाकरिता विहिरी देणारे शेतकरी, पाणीपुरवठा विभागात चकरा मारीत होते. वाढत्या मागणीनंतर पाणीपुरवठा विभागाने शासनाकडे पत्रव्यवहार केला. जवळपास वर्षभरानंतर शासनाने सव्वातीन कोटी रुपयांचा निधी पाणीपुरवठा विभागाला दिला. यंदाच्या टंचाईत खासगी विहिरींच्या अधिग्रहणाची कामे प्रस्तावित आहेत.
ही कामे सुरू करण्यापूर्वी निधी आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. नवीन कामे करताना जुनी देयके निकाली काढण्यात आली आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. शंभराहून अधिक महसुली मंडळांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून कामे सुरू आहेत.
यंदा उन्हाळ्यात दिलासा
जानेवारी ते जून महिन्यापर्यंत २५६ गावांत २७४ खासगी विहिरींचे अधिग्रहण, विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे व १२ गावांत टँकरने पाणीपुरवठा आदी उपाययोजना यंदाच्या टंचाई आराखड्यात सुचविण्यात आलेल्या आहेत.
यासाठी दोन कोटी १५ लाख ८० हजार रुपयांचा टंचाईचा कृतिआराखडा तयार करण्यात आला आहे. एप्रिल महिना सुरू झाला असून, अद्याप एकाही गावात टंचाईच्या अनुषंगाने उपाययोजना करावी लागलेली नाही. म्हणून यंदा उन्हाळ्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.