
Crop Damage News पुणे : अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान (Hailstorm Crop Damage) झाल्याबाबत पीकविम्याची (Crop Insurance) नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापर्यंत अंदाजे सव्वादोन लाख सूचना दाखल केल्या आहेत.
दरम्यान, भरपाईपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे कृषी आयुक्तालयाने विमा कंपन्यांना बजावले आहे.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकात नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी १.६० लाखाहून अधिक सूचना दाखल केल्या आहेत. तसेच, काढणीपश्चात नुकसानीच्या घटकासाठी ५६ हजारांपेक्षा जास्त सूचना आलेल्या आहेत.
विमा कंपन्यांना आयुक्तालयाने एक तातडीचे पत्र पाठवले आहे. ‘‘नुकसान भरपाई प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवावी. तसेच, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची काळजी घ्यावी,’’ असे कंपन्यांना सांगितले गेले आहे.
राज्यात १ मार्च ते २२ मार्च या दरम्यान अवेळी पाऊस व गारपिटीमुळे बहुतेक सर्व प्रकारातील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, विमा योजनेच्या कक्षेत सर्व पिके समाविष्ट नाहीत. त्यामुळे योजनेच्या बाहेरी पिकांना भरपाई मिळणार नाही.
पंतप्रधान पीक विमा योजनेत समावेश असलेली आणि नुकसानदेखील झालेली पिके बघता यात गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आघाडीवर आहे. या पिकांना योजनेतून भरपाई मिळू शकते.
मात्र, फळपिकांसाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेतून भरपाई मिळणार आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांनी स्वतःहून ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीला कळविणे अत्यावश्यक आहे.
नुकसानीबाबत माहिती कळविण्याच्या या प्रक्रियेला ‘सूचना देणे’ (इंटिमेशन) असे म्हटले जाते. वेळेत सूचना देण्यासाठी विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना जागृत करणे व सूचना अर्ज (इंटिमेशन फॉर्म) वाटप करून पुन्हा ताब्यात घेणे, ही महत्त्वाची कामे कंपन्यांनी वेळेत करणे अत्यावश्यक आहे.
“फळपिकांचे नुकसान झाले असले तरी सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची तरतूद या योजनेत नाही. गारपिटीचा स्वतंत्र विमा हप्ता भरलेला असेल तरच भरपाईसाठी अर्ज करता येतो.
त्यासाठी विमा कंपन्यांनी याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याची गरज आहे,” असे कृषी खात्याचे म्हणणे आहे. फळपिकांबाबत शेतकऱ्यांनी भ्रमणध्वनीचा लघुसंदेश पाठवूनदेखील सूचना दाखल करता येणार आहे.
सूचना अर्ज खालील ठिकाणी मिळतील
- तालुका व क्षेत्रिय स्तरावरील कृषी अधिकारी आणि कर्मचारी, संबंधित बॅंक शाखा, विमा कंपनीची जिल्हा व तालुका कार्यालये
सूचना अर्ज या बाबींसाठी वापरले जातील :
- स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान भरपाई मिळण्यासाठी
सूचना अर्ज दाखल करण्यासाठी मुदत :
पिकाचे नुकसान झाल्याची घटना घडताच ७२ तासांच्या आत.
फळपिक असल्यास नियम :
- केवळ फळपिकाचा विमा काढला म्हणून भरपाई मिळणार नाही. गारपिटीचा अतिरिक्त विमाहप्ता भरला असेल तरच मिळणार भरपाई.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.