
Maharashtra Weather : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सरासरीच्या तुलनेत ९९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. परंतु सध्या पावसाने ओढ दिल्यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा कमी पावसामुळे राज्यातील खरीप पीक उत्पादन संकटात सापडण्याची चिन्हे आहेत, असे संकेत राज्याच्या कृषी विभागाकडून मिळाले आहेत.
हिंदुस्थान टाईम्सने यासंबंधातील बातमी प्रकाशित केली आहे. त्यानुसार राज्यात यंदा खरीप पिकांचे चित्र चिंताजनक आहे. या बातमीत दिलेल्या माहितीनुसार राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात २०२३ मध्ये १४०.१४ लाख हेक्टरवर खरीप पेरणी झाली आहे. याचा टक्केवारीत विचार केला असता ती ९९ टक्क्यांवर जाते.
राज्यातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण यासारख्या अनेक प्रदेशात पावसाच्या दीर्घ व्यत्ययामुळे पिके जवळपास खराब झालेल्या स्थितीत आहेत. याचबरोबर आता दुबार पेरणी वेळ निघून गेल्याने दुबार पेरणीही शक्य नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
हिंदुस्तान टाईम्सने राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना उध्दृत केले आहे. त्यानुसार यावर्षी १ जून ते ३० ऑगस्टपर्यंत राज्यात ८३ टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील ३८५ तालुक्यात मागच्या २१ दिवसांत शून्य पावसाची नोंद झाली आहे. तर ४९६ तालुक्यांमध्ये मागच्या १५ ते २१ दिवसांत अत्यत तूरळक पाऊस झाला आहे.
बातमीत दिलेल्या माहितीनुसार कृषी विस्तार सहसंचालक विनय आवटे म्हणाले, ``जवळपास ९९ टक्के पिकांची पेरणी झाली आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने अनेक पिके करपण्याच्या मार्गावर असून खरीप पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.``
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकताच मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेतला. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी केवळ नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातच चांगला पाऊस झाल्याचे त्यांनी सांगितले. अपुरा पाऊस असल्याने पाणीसाठ्यावर लक्ष ठेवून चारा पुरविण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत, असे मुंडे यांनी आढावा बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर आणि पुणे हे जिल्हे अनेक शेतीमालाचे प्रमुख पुरवठादार आहेत. तिथे कमी पाऊस झाल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, मराठवाड्यात चारा टंचाईचे संकट गंभीर झाले असून पशुपालक शेतकरी चिंतेत पडले आहेत. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात चाऱ्याची टंचाई आहे. सर्व जिल्ह्यांत मिळून केवळ ८५ दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.