
Kolhapur Rain News : मागच्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने कोल्हापूरकरांना काल थोडा दिलासा दिला. शहर, परिसर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी काल (ता.१७) दुपारनंतर पावसाने दमदार सुरूवात केली. आठ दिवसांहून अधिक काळ गायब झालेल्या पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने शेतकऱ्याला थोडा आधार मिळाला आहे. दरम्यान काल झालेल्या पावसाने अनेक भागात पाणी साचले होते.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात २२ ऑगस्टपर्यंत पाऊस असणार आहे. तर २० ऑगस्टपर्यंत दमदार पावसाची शक्यता आहे. २१ व २२ ऑगस्टपर्यंत पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मागच्या ८ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली होती. पंचगंगेसह जिल्ह्यातील दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांची, ओढ्यातील पाणी कमी झाले आहे. तर माळरानावर पिकवलेल्या ज्वारी, भुईमूग, सोयाबीनला सध्या पाण्याची गरज आहे. पाऊस नसल्याने सर्वच पिकांची वाढ खुंटली होती. गडहिंग्लज, शिरोळ, हातकणंगले या तालुक्यांत इतर ठिकाणी दुपारच्या वेळी उन्हाळ्यासारखे ऊन पडत होते.
हवेत कमालीची उष्णता वाढली होती. यामुळे शेतकऱ्यांसह साऱ्यांनाच पावसाची प्रतीक्षा लागून राहिली होती. बुधवारी पहाटेपासून आकाशात ढगांची गर्दी राहिली. सकाळी साडेदहाच्या सुमारास कागल, चंदगड पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांतील काही भागात हलका पाऊस झाला.
काल दुपारनंतर कोल्हापूर शहरात जोरदार पावसाने आगमन केले. अचानक पाऊस सुरू झाल्याने पादचारी, दुचाकी, फेरीवाले, विक्रेत्यांची तारांबळ उडाली. रस्त्याकडेला असलेले झाड, पत्र्याचे शेड, घराचा आसरा घेऊन अनेकजणांनी पावसापासून बचाव केला. अर्धा तास जोरदार पाऊस पडला. त्यानंतर काही अंतराने पावसाच्या सरी कोसळत राहिल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.