
Ratnagiri News : जिल्ह्याच्या उत्तर भागातील खेड, दापोली, चिपळूण तालुक्यांतील पावसाचा जोर कमी झाला असला तरीही दक्षिण भागातील राजापूर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले. अन्य सर्व तालुक्यात सरींवर सरी पडत आहेत.
कोदवली नदीला आलेल्या पुराचे पाणी किनाऱ्यावरील भातशेतीत साचून राहिले आहे. तर शहरातील जवाहर चौकात पुराने वेढा घातला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत राजापूर तालुक्यात सर्वाधिक ११० मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी ७२.२२ मिमी पाऊस झाला.
मंडणगडमध्ये ७६ मिमी, दापोली ५०, खेड ३७, गुहागर ६७, चिपळूण १०२, संगमेश्वर ६८, रत्नागिरी ४९, लांजा ९१, राजापूरमध्ये ११० मिमी पाऊस झाला. पावसामुळे नदीपातळीत वाढ झाली आहे. जगबुडी नदीची पाणीपातळी ६.३५ मीटर, शास्त्री नदीची पाणीपातळी ६.६० मीटर, काजळी नदीची पाणीपातळी, कोदवली नदीची पाणीपातळी ६.४० मीटर आहे.
राजापूर तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना-कोदवली नद्यांच्या पाण्याची पातळीमध्ये वाढ होऊन सलग तिसऱ्या दिवशी पुराच्या पाण्याने शहराला वेढ घातला आहे.
शनिवारी (ता. २२) रात्री जवाहर चौकातील जयस्तंभापर्यंत आलेले पुराचे पाणी रविवारी दुपारपर्यंत तसेच होते. अर्जुना-कोदवली नदीच्या पुराच्या पाण्याखाली शहरातील विविध भाग गेला आहे. शीळ-गोठणेदोनिवडे रस्त्यावर सलग चौथ्या दिवशी पुराचे पाणी होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
नद्यांच्या काठावरील शीळ, उन्हाळे, दोनिवडे, गोठणेदोनिवडे आदी भागांतील भातशेतीही पुराच्या पाण्याखाली गेली होती. पावसासोबत वाऱ्याचाही तालुक्यामध्य जोर असून ग्रामीण भागामध्ये ठिकठिकाणी पडझड होवून नुकसान झाले आहे. त्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पूरस्थितीकडे प्रशासन लक्ष ठेवून असून नागरिकांना मदतीसाठी सर्व यंत्रणासह प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान, काजळी नदीही इशारा पातळीवर वाहत असल्यामुळे किनाऱ्यावरील भागांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. चांदेराई बाजारपेठेजवळ गाळ काढल्यामुळे अद्याप पूर आलेला नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.