
Ahmednagar News : ‘पावसाळा सरला की दिवाळीच्या काळात शेळ्या-मेंढ्या घेऊन गाव सोडतो. पावसाळ्याच्या तोंडावर गावकडं जातो. यंदा पावसाळा सुरू होऊन तीन महिने होत आलं. अजूनबी पाऊस नाही. पाऊसच नाही तर गावांकडं जाऊन काय करणार, पाणी नाही, चारा नाही. जित्राब जगवणं अवघड झालंय.
पाऊस पडल्याशिवाय आता गावाकडं जाणार नाही. अशीच भटकंती करून जनावरं जगवू.’’ श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव परिसरात शेळ्या-मेंढ्या घेऊन भटकंती करणाऱ्या मेंढपाळांनी आपली भावना व्यक्त केली. नगर, पुणेच नाही, तर राज्यातील अनेक भागांत पाऊस नसल्याचे सांगून त्यांनी दुष्काळीची दाहकता स्पष्ट केली.
पुणे, नगरसह अन्य भागांतील मेंढपाळ भटकंती करतात. पुणे जिल्ह्यातील जेजुरी, सासवड भागांतील मेंढपाळ हे शेतकरीच. शेळ्या -मेंढ्याचे पालन करणे, राज्यातील विविध भागात फिरून त्यांना जगवणे हा पारंपरिक आणि जुना व्यवसाय. दर वर्षी दिवाळीनंतर शेळ्या-मेंढ्या घेऊन भटकंतीला निघतात. पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद, बीड आदी भागांतून मजल-दरमजल करत सहा-सात महिन्यांच्या भटकंतीनंतर पुन्हा पावसाळा सुरू झाला की गावी येतात.
गेल्या वर्षी घर सोडलेले अनेक मेंढपाळ यंदा अजूनही घरी आलेले नाहीत. सातशे मेंढ्याचा कळप घेऊन जात असलेले मेंढपाळ दोन दिवसांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यात भेटले. भेटलेल्या मेंढपाळांनी दुष्काळीची दाहकता स्पष्ट केली.
यंदा पुण्यापासून नाशिक, नगर, बीड, औरंगाबाद अशा कोणत्यांच भागात चांगला पाऊस नाही. जोरदार पाऊस झाला तर मेंढ्यांना पाणी, माळरानावर चारा उपलब्ध होतो. तो चारा अगदी मार्चपर्यंत पुरतो. यंदा पावसाळ्यातच चारा नाही, प्यायला पाणी नाही, आताच जित्राब जगायची चिंता आहे. पुढच्या काळात, म्हणजे उन्हाळ्यात कसे दिवस काढणार आम्ही पाऊस पडला की गावी-घरी जातो. यंदा अजूनही पाऊस नाही तर घरी जाऊ काय करणार, असे सांगत यंदाचा दुष्काळ गंभीर आहे असल्याची स्पष्टता व्यक्त केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.